भिलवडी : पलूस तालुक्यातील २६ गावांमध्ये कृष्णेच्या महापुराने शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे राज्य शासनाने तात्काळ मदत द्यावी, संपूर्ण कर्जमाफी करावी आदी मागण्यांचे निवेदन कृष्णाकाठची सर्वपक्षीय नेतेमंडळी व शेतकऱ्यांनी पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांना दिले.
पूरग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, पीककर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना कर्जाचा तगादा लावणाऱ्या बँका व वित्तीय संस्थांना शासनाने प्रतिबंध करावा, सरसकट सानुग्रह अनुदान द्यावे, महापुरात बुडालेल्या उसाला साखर कारखान्यांनी प्राधान्यक्रम द्यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, पलूस पंचायत समितीचे सभापती दीपक मोहिते, विजय पाटील, मोहन पाटील, शहाजी गुरव, बाळासाहेब मोहिते, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, कृष्णदेव पाटील आदी उपस्थित होते.