जत : जत शहर व परिसरात बुधवारी ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. हे वातावरण फळपिकांसाठी हानिकारक असले तरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसाठी उपयुक्त असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
मागील आठ-दहा दिवसांपासून सकाळी व सायंकाळी थंडी आणि दुपारी कडक ऊन पडत होते. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. याचा फटका फळबागांना बसण्याची शक्यता आहे. फळपिकावर बुरी, बुरशी, मिलीबग व तयार झालेल्या फळांना तडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फळपिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग औषध फवारणीच्या कामात गुंतला आहे.