शिराळा : विश्वास उद्योग समूहातील सर्जेरावदादा नाईक बँक कोणामुळे बंद झाली, हे सर्वांना माहीत आहे. मात्र शेतकरी, सभासदांचे पैसे मिळण्यासाठी सहा महिन्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सर्व कागदपत्रांसह पैसे मागणीचे अर्ज बँकेत करावेत, असे आमदार मानसिंगराव नाईक यांनी शुक्रवारी (दि. २४) पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, या उद्योग समूहातील सर्व संस्था आदर्शपणे सुरू आहेत. मात्र ही बँक कोणामुळे बंद पडली हे सर्वांना माहीत आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, सामान्य नागरिकांचे पैसे अडकले आहेत. ते मिळावेत यासाठी सहा महिने अर्थमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, रिझर्व्ह बँकेचे पदाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, बँकेकडे पैसे अडकलेल्या सर्वांनी रीतसर पैसे मागणीसाठी अर्ज करावा तसेच लागणारी कागदपत्रे जोडावीत. यासाठी विश्वास साखर कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी मदत करतील. गरज पडल्यास हे अधिकारी व कर्मचारी घरी येऊन सहकार्य करतील.
महापुरामुळे ऊस बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही अधिकारी व कर्मचारी भेटून सर्व माहिती देतील. ऊस उताऱ्यासाठी मदत करतील. या उसाची तोड प्राधान्याने करण्यासाठी वेगळा कार्यक्रम राबवू, असेही त्यांनी सांगितले.