लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अपरिहार्य असताना, वीजबिल चुकविण्यासाठी काही जण विद्युत मीटरमध्ये फेरफार करून महावितरणची फसवणूक करत आहेत, परंतु ही वीजचोरी उघड झाल्यास संबंधित व्यक्तीच्या घरात कायमचा अंधार होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊन प्रसंगी तुरुंगाची हवा खाण्याचीही वेळ येऊ शकते.
जिल्ह्यात महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. वीज वापराच्या मोजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जाते. मीटर रीडिंगनुसार वीजबिलाची आकारणी केली जाते. वीजबिल चुकविण्यासाठी काही ग्राहक चक्क मीटरमध्येच हेरफेर करतात. वीजचोरी पकडली गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५, १३८ व १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.
चौकट
मीटरजप्ती व मोठा दंड
वीजचोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीजचोरी पकडली गेल्यास, त्याला चुकविलेल्या वीजबिलाची रक्कम, दंड व तडजोडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येतो. हा स्वीकारल्यास अशा ग्राहकांचा वीजपुरवठा पुन्हा जोडला जाऊ शकतो. तथापि, तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर मीटर जप्त करून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.
चौकट
कधीही होऊ शकते मीटरची तपासणी
विद्युत चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणचे पथक सदैव दक्ष असतात. एखाद्या ठिकाणी वीजचाेरी होत असल्याची शंका आल्यास किंवा कुणी गुप्त माहिती दिल्यास ही पथके संबंधित व्यक्ती, उद्योग अथवा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकून मीटरची तपासणी करू शकतात.
चौकट
वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
वर्ष कारवाया
२०१९ - ३८८
२०२० - १८४
२०२१ - १३९
वीजचोरी हा कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. मीटरमध्ये हेरफेर केल्याचे आढळल्यास अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्याची विशेष मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. वीजचोरांवर कठोर कारवाई करून सामान्य ग्राहकांना न्याय देणार आहे.
- धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, सांगली, महावितरण.