मिरज : शाळेत जाऊ नये, यासाठी सागर शंकर हेरवाडे या १२ वर्षांच्या बालकाच्या पायात सुमारे दोन किलो वजनाच्या लोखंडी बेड्या घालून जन्मदात्या पित्यानेच त्याला शिक्षा दिली. मिरज तालुक्यातील आरग येथे हा प्रकार घडला. ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी बुधवारी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्याची सुटका केली. अथणी तालुक्यातील केंपवाड येथील हेरवाडे कुटुंबीय मजुरीसाठी आरग येथे वास्तव्यास आहेत. सागरचे वडील शंकर हेरवाडे यांनी, सागर ऊसतोडणीच्या कामासाठी सोबत येत नाही. वारंवार शाळेला जाण्याचा हट्ट करीत असल्याबद्दल कर्नाटकातील एका भोंदूबुवाची भेट घेतली. भोंदूबुवाच्या सांगण्यावरून सागरच्या पायात जाड लोखंडी बेड्या घालण्यात आल्या. जड बेड्यांमुळे सागरला चालणे-फिरणे अवघड झाले होते. यामुळे शाळेला न जाता सागर लंगडत कसाबसा फिरत होता. शाळेला जाण्यासाठी त्याचा आक्रोश सुरू होता; मात्र पित्याला त्याची दया आली नाही. त्याचा शाळेला जाण्याचा हट्ट म्हणजे कशाची तरी बाधा झाल्याचे समजून त्याच्या पायात अतिरेक्यांप्रमाणे बेड्या घालून चार दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. ऊसतोडणीच्या कामासाठी सोबत येण्यासाठी वडिलांनी त्याला शिक्षा दिली होती. सागर हा बुधवारी आरग ते शिंदेवाडीदरम्यान ‘रिपाइं’चे कार्यकर्ते लक्ष्मण नाईक यांना दिसला. पायातील बेड्यांमुळे रडकुंडीला आलेल्या सागरची त्यांनी विचारपूस केल्यानंतर वडिलांनी बेड्या घातल्याचे त्याने सांगितले. त्याला मिरजेत आणून ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, हुसेन शेख, सतीश जाधव, पोपट कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्याकडे नेले. उपअधीक्षक पाटील यांनी या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. खेळण्या-बागडण्याच्या वयात लहान बालकाच्या पायात बेड्या घालण्याच्या पित्याच्या अघोरी कृत्यामुळे खळबळ उडाली होती. वर्षभर बेड्या घातल्याची तक्रारसागर याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण कन्नड माध्यमात झाले आहे. सहावीत मराठी शाळेत जाणाऱ्या सागरला शाळा बंद करून शेतात कामाला जाण्याची पित्याने सक्ती केली होती. मात्र, शाळेला जाण्याच्या हट्टामुळे गेले वर्षभर पित्याने पायात लोखंडी बेड्या घालून ठेवल्याची माहिती सागर याने पोलिसांना दिली. या प्रकरणी दिलीप नाईक यांच्या तक्रारीवरून पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या.सांगलीतील घटनेची आठवण...काही वर्षांपूर्वी सांगलीच्या जामवाडी येथील एका मतिमंद मुलीला तिच्या पित्यानेच साखळदंडाने बांधून ठेवल्याची घटना घडली होती. मतिमंद असल्याने ती कोठे जाऊ नये, म्हणून साखळदंडाने बांधून तो व्यवसायासाठी निघून जायचा. प्रकरण उघड झाल्यानंतर एका सामाजिक संस्थेने त्या मुलीची जबाबदारी स्वीकारली. आरग येथे मात्र मुलाने चांगले स्वप्न बघूनही त्याला त्याच्या क्रूर पित्याने अशी शिक्षा दिल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
‘त्याच्या’ स्वप्नांनाच बेड्या...
By admin | Updated: November 26, 2015 00:29 IST