सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश झुगारून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने गुरुवारी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे संयोजन करणाऱ्यांवर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाच्या वतीने सकाळी जमावबंदी तर रात्री संचारबंदी आदेश लागू केले आहेत. जमावबंदी कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना जमा होण्यास परवानगी नसताना गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. भाजप नेत्यांच्या पुढाकाराने निघालेल्या या माेर्चात व्यापारी संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
या मोर्चामध्ये आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचाही सहभाग होता.
जमावबंदी असताना त्याचे उल्लंघन करीत मोर्चा काढल्याबद्दल या मोर्चाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संयोजक धीरज सूर्यवंशी, अमोल कणसे, गजेंद्र कुल्लोळी, विराज कोकणे, अतुल शहा, अतुल माने, अशरफ वांकर, दीपक माने, किरण भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.