सांगली : उपयोगकर्ता कर, फेरीवाला धोरणप्रश्नी महापालिकेने संघटनेला दिलेले आश्वासन पाळले नसल्याने दैनंदिन परवाना शुल्कावर बहिष्कार टाकून असहकार आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी दिली.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी संघटनेने उपयोगकर्ता कर, फेरीवाला धोरणप्रश्नी महापालिकेवर मोर्चा काढला होता. मोर्चाच्या शेवटी आणि उपोषण सोडण्यासाठी महापालिकेने आश्वासन दिले होते. आंदोलनानंतर आता ते आश्वासन पाळत नसल्यामुळे सोमवारपासून संघटना असहकार आंदोलन म्हणून दहा रुपयांची दैनंदिन परवाना पावतीवर बहिष्कार टाकला आहे. कुठलाही पथविक्रेता फेरीवाला भाजी विक्रेता महापालिकेस शुल्क देणार नाही.
संघटनेची सोमवारी बैठक पार पडली. त्यात काटकर म्हणाले की, आंदोलनाच्या बाबतीत महापालिका प्रशासनाची भूमिका ही दुटप्पी आहे. महापालिका प्रशासनाने २२ डिसेंबरपासून जी भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नसल्यामुळे आम्हाला सहकार्य करण्याची त्यांची भूमिका नाही, असे ठाम मत झाले आहे. त्यामुळे जनसेवा भाजीपाला संघटनेने सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील महापालिका प्रशासनाला असहकार्याची भूमिका घेण्याचे ठरवले आहे. सर्व फेरीवाल्यांना, भाजी विक्रेत्यांना, पथविक्रेत्यांना आम्ही आवाहन करतोय की, रोज आपण जी १० रुपये भाड्याची पावती देतोय ते शुल्क कोणीही घ्यायचे नाही. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनप्रमाणे राज्य पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठवडाभरात मुंबईत नगरविकास मंंत्र्यांच्या दालनात बैठक होणार आहे. यासाठी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील प्रयत्नशील आहेत. जोपर्यंत बैठक होऊन त्यात निर्णय होत नाही तोपर्यंत प्रशासनाने घेतलेली चुकीची भूमिका शासन, धोरणांच्या विरोधात घेतलेली भूमिका याचा निषेध म्हणून संघटनेच्यावतीने असहकार आंदोलन सुरू केले आहे, असे काटकर यांनी सांगितले.