जत : लोकसभा निवडणुकीत जत तालुक्यातील मतदारांनी मला मताधिक्य मिळवून दिले आहे. त्या विश्वासाला पात्र राहून मी म्हैसाळ योजनेचा बिळूर व देवनाळ कालवा पूर्ण करण्याच्या कामास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही खा. संजय पाटील यांनी दिली.
तालुक्यातील संख, दरीबडची, उमदी, माडग्याळ, मुचंडी या पाच जिल्हा परिषद मतदार संघातील २५ गावात खासदार पाटील यांचा आभार दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. नादुरुस्त रस्ते, वीज, पाणी, तालुक्याचे विभाजन, डफळे साखर कारखाना हे येथील महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे सांगून खा. पाटील म्हणाले की, म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी जत तालुक्यात आले आहे. या योजनेचा बिळूर व देवनाळ कालवा पूर्ण करुन पूर्व भागात सायफन पद्धतीने पाणी देण्याच्या कामाला मी अग्रक्रम देणार आहे.
जतचे नगरसेवक उमेश सावंत यांनी स्वागत केले. यानंतर तालुक्याचे नेते विलासराव जगताप, जि. प. उपाध्यक्ष बसवराज पाटील, जत पं. स. सभापती बसवराज बिराजदार, जनसुराज्यचे तालुका अध्यक्ष अँड. एस. के. पुजारी यांची भाषणे झाली. रमेश बिराजदार, पं. स. सदस्य नितीश शिंदे, बाबूराव दुधाळ व आप्पा दुधाळ, शरणाप्पा कुंभार, विठ्ठल दुधाळ, विठ्ठल दलवाई उपस्थित होते. (वार्ताहर)