अशोक पाटील --इस्लामपूर --वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी फोफावली आहे. मात्र इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या वटवृक्षामुळे काँग्रेसची वाढ खुंटली आहे. तथापि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे नेते इस्लामपुरातील कार्यकर्त्यांना आधार देण्यास सरसावले आहेत.वाळवा व शिराळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पेठनाक्यावरून काँग्रेसचा रथ हाकला जात होता, परंतु काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी राष्ट्रवादीला हाताशी धरून कुरघोड्या करत पेठनाक्यावरील काँग्रेस संपुष्टात आणली आहे. तेव्हापासून वाळवा तालुक्यासह इस्लामपूर शहरात काँग्रेसला खमके नेतृत्व लाभलेले नाही. तालुका पातळीवर सी. बी. पाटील (कामेरी), बाळासाहेब पाटील (साखराळे), जितेंद्र पाटील (बोरगाव), आनंदराव पाटील (येडेनिपाणी), वैभव पवार, विजय पवार (इस्लामपूर) यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसच्या यादीत नाव घेण्यासारखा नेता उरलेला नाही. आता यांना बळकटी देण्यासाठी जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम आणि प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सदाशिवराव पाटील सरसावले आहेत.गेल्या पाच वर्षात शहरात सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही प्रश्न काँग्रेसने सोडविलेले नाहीत. तालुक्यातील काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले आहे.दिग्गजांचा रामरामआमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, डॉ. प्रताप पाटील, अभिजित पाटील यांनी काँग्रेस वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. परंतु शिराळा तालुक्यात दोन शिवाजीराव एका म्यानात राहू शकले नाहीत. याचा फटका शिवाजीराव नाईक यांना बसला. त्यांनी काँग्रेस सोडून विकास आघाडी स्थापन केली. काँग्रेसमधील गटबाजीमुळे या सर्व नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.आगामी सर्वच निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याने इस्लामपूर पालिका निवडणुकीतही काँग्रेस उतरणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या नवख्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. - जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य, बोरगाव
इस्लामपुरात कोलमडलेल्या कॉँग्रेसला नेत्यांचा आधार
By admin | Updated: September 9, 2016 01:14 IST