कुपवाड : शहरातील तलाठयांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे शहरातील नागरिकांच्या बऱ्याच वर्षांपासून दस्तांच्या नोंदी प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून कोतवाल आणि कर्मचारी यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांच्याकडून उध्दट उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या गैरकारभाराच्या विरोधात कुपवाड शहर भाजपचे अध्यक्ष रवींद्र सदामते यांनी सांगलीतील अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तलाठी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
कुपवाड तलाठी कार्यालयामध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. एजंटाकडून आर्थिक तडजोडी झाल्यानंतर त्वरित नोंदी केल्या जात आहेत. शहरातील एका गुप्त ठिकाणी जाऊन या तडजोडी झालेल्या नोंदी केल्या जात आहेत. मात्र, शहरातील गोरगरीब नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या नोंदी प्रलंबित आहेत. तलाठी कार्यालयामध्ये नुकतीच नेमणूक झालेले तलाठी कार्यालयात वेळेवर हजर नसतात. वरिष्ठ कार्यालयात गेल्याचे खोटे सांगून तडजोडीच्या नोंदी करण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप रवीद्र सदामते यांनी केला आहे.
याबरोबरच शहरातील विद्यार्थ्यांचे दाखलेही वेळेवर दिले जात नाहीत. तलाठ्यांचा मोबाईल बंद असण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे गोरगरिबांना उध्दट बोलणे आणि वृध्द व महिलांना तासन् तास ताटकळत थांबविण्याचे प्रकार बंद न झाल्यास येत्या आठ दिवसात तलाठी कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सदामते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी भाजपचे नेते माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, अशरफ वांकर, नगरसेवक संजय कुलकर्णी, माजी सभापती विनायक सिंहासने, किरण भोसले आदी उपस्थित होते.
फोटो ०८कुपवाड०२/ओळ :
कुपवाड शहर भाजपच्यावतीने अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रवींद्र सदामते, धीरज सूर्यवंशी, अशरफ वांकर, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने उपस्थित होते.