लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गावा-गावातील शिवारात ई-पीक पहाणी नोंदीची मोहीम गतिमान करण्यात आली असून, त्यासाठी खानापूर तालुक्यातील पाच मंडल विभागात पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जात आहे. ॲण्ड्रॉईड मोबाइल नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वीस युवकांचे पथक कार्यरत केले असून, त्यांच्यामार्फत ई-पीक पहाणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
खानापूर तालुक्यात प्रांताधिकारी संतोष भोर यांनी मंडळनिहाय पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. विटा मंडळ विभागात प्रांताधिकारी भोर, भाळवणी मंडळमध्ये तहसीलदार हृषीकेश शेळके, करंजेमध्ये नायब तहसीलदार चेतन कोनकर, खानापूरमध्ये निवासी नायब तहसीलदार प्रतीक्षा भुते, लेंगरेमध्ये यशवंत बांडे तर नागेवाडी मंडळमध्ये श्रीमती त्रिवेणी गुरव यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या सर्व मंडळामध्ये अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांना ई-पीक नोंदीबाबत माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी भोर व तहसीलदार शेळके यांनी शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत सात-बारा उताऱ्यावर ई-पीक पहाणी नोंद करावी, अन्यथा त्यांना पीक कर्ज, पीक विमा आदी सुविधांपासून वंचित रहावे लागेल. मोबाइल ॲपद्वारे पिकाची पीक पहाणी नोंदणी करून फोटो त्यावर अपलोड करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.