मिरज : जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी आपली दुकाने व घरातील वीज संच मांडणी पाण्यामध्ये भिजली असल्यास त्याची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
ज्या पूरबाधित शेतकऱ्यांच्या शेतात शेतीपंपाची मीटर पेटी व मोटर पुराच्या पाण्यात भिजली असल्यास वीज सुरु करण्यापूर्वी वीज संच मांडणी अधिकृत व्यक्तीकडून तपासून सुस्थितीत व धोकाविरहीत असल्याची खात्री करुनच वीज सुरु करावी. तसेच लहान मुलांना वीज संच मांडणी हाताळण्यास मज्जाव करावा. महावितरणच्या तारा व खांब पुराच्या पाण्यामुळे वाकले, तुटले किंवा तुटून जमिनीवर पडले असल्यास तुटलेल्या तारांना स्पर्श करु नये. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्युत निरीक्षक शहाजी कोळी यांनी केले आहे.