मिरज : कोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर कर्नाटकातील भाजप नेत्यांच्या दबावामुळे आणखी एक टीएमसी पाणी कर्नाटकसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकसाठी शनिवारपासून कोयनेतून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयनेतून दोन टीएमसी पाणी देण्यात येत असताना कर्नाटकातून अद्याप अक्कलकोटला पाणी सोडण्यात आलेले नाही. कर्नाटक सीमा भागात तीव्र पाणी टंचाईमुळे बुधवारपासून कोयना व वारणा धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात आले. कर्नाटकातील जमखंडीजवळ हिप्परगी धरणापर्यंत हे पाणी पोहोचले. शनिवारी कोयना धरणातून विसर्ग बंद करण्यात येणार होता. मात्र एक टीएमसी पाणी अपुरे असल्याने आणखी एक टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली. जलसंपदा विभागाने कोयना व वारणा धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने व जूनमध्ये पाऊस पडला नाही तर उर्वरित पाणीसाठा आवश्यक असल्याने कर्नाटकला आणखी पाणी देण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र आणखी पाण्याच्या मागणीसाठी चिकोडीचे खा. प्रकाश हुक्केरी यांच्यासह कर्नाटकातील शिष्टमंडळाने मुंबईत तळ ठोकला होता. कर्नाटकसाठी आणखी पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शनिवारपासून कोयनेतून पुन्हा प्रतिसेकंद चार हजार क्युसेक्स वेगाने सोडण्यात येत आहे. आणखी पाणी उपलब्ध झाल्याने कर्नाटकातील सीमाभागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाणी देताना कर्नाटकातील सिंचन योजनेतून अक्कलकोटला पाणी सोडण्याचे ठरले आहे. मात्र कर्नाटकातून अक्कलकोटला अद्याप पाणी सोडण्यात आले नाही.
कर्नाटकसाठी कोयनेतून आणखी एक टीएमसी पाणी
By admin | Updated: May 1, 2016 00:27 IST