प्रताप महाडिक - कडेगाव जलवाहिनीची गळती काढण्याचे काम जेसीबी यंत्रापेक्षा कमी वेळात फत्ते करणारे अंबक येथील मलकाप्पा नाटेकर (वय ४५) हे ‘जेसीबी मामा’ म्हणून सोनहिरा खोऱ्यात परिचित आहेत. परिसरातील पाणीपुरवठा योजनेला किंवा शेतकऱ्यांच्या जलवाहिनीला गळती लागली की, ‘जेसीबी मामां’चा भ्रमणध्वनी वाजतो. ते तात्काळ सायकलवर खोरे, टिकाव, पाटी घेऊन संबंधित ठिकाणी पोहोचतात. एका तासात गळती काढून पुढील कामास रवाना होतात! खुदाई कामात पारंगत असलेल्या जेसीबी मामांनी दोन मुलांचे शिक्षण व मुलीचे लग्न करून पुणे आणि विजापूर येथे स्वत:चे घर बांधले आहे.मलकाप्पा नाटेकर यांचे मूळ गाव विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील गोडीआळ. मलकाप्पांच्या वडिलांनी दारूच्या व्यसनात सर्व शेतजमीन विकून टाकली. २० वर्षांपूर्वी मलकाप्पा मोलमजुरीसाठी अंबक येथे आले. त्यानंतर काही काळ पुण्यात मोलमजुरीचे, खुदाईचे काम केले. सोनहिरा कारखान्याच्या पायाभरणीवेळी सातत्याने पाच वर्षे खुदाईचे काम केले. प्रामाणिकपणे आणि जलद काम केल्यामुळे कष्टाचा योग्य मोबदलाही मिळत गेला. पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब पुण्यात ठेवले आणि एकटे मलकाप्पा काबाडकष्ट करीत राहिले. जलवाहिनीची गळती काढणे हे काम त्यांचा हातखंडा ठरू लागले. दिवसातून पाच ते आठ ठिकाणी ते गळती काढतात. आजच्या दराने दररोज दोन ते तीन हजार रुपये मिळतात. जेथे गळती काढली, तेथे पुन्हा गळती लागली, तर मलकाप्पा ती मोफत काढून देतात. एका मजुराकडून कामाची ‘गॅरंटी’ मिळते, याचे शेतकऱ्यांना कुतूहल वाटते.वीस ते पंचवीस वर्षांपासून सातत्याने खुदाई काम करणारे सहा फूट उंचीचे मलक्काप्पा टिकावाने १० ते १५ मिनिटात गळती शोधतात. गळती लागलेल्या ठिकाणचा भाग कापून त्या ठिकाणी नवीन जलवाहिनीचा जोड ठेवून, रस्ता पुन्हा बुजवून एका तासात काम फत्ते करतात. हे काम जेसीबी यंत्राच्या साहाय्यानेही इतके जलद होत नाही, म्हणूनच ते ‘जेसीबी मामा’ म्हणून परिचित झाले आहेत.सोनहिरा खोऱ्यातील १५ गावांमधून जेसीबी मामांना जलवाहिनीची गळती काढण्यासाठी बोलावणे येते. सायकलस्वारी करीत ते कामाच्या ठिकाणी पोहोचतात. सायकलच्या ‘डिकी’वरही ‘जेसीबी मामा’ असा फलक त्यांनी लावला आहे. पुढे यल्लम्मादेवीचे छायाचित्र आहे. अमावास्येच्या दिवशी जेसीबी मामांचे काम बंद असते. त्यावेळी ते देवदर्शनाला जातात. खुदाई-गळतीचे काम करताना ते मोबाईलवर देवाची गाणी लावतात. बॅटरी डिसचार्ज झाली की तात्काळ दुसरी बॅटरी टाकतात, परंतु मोबाईल सदैव सुरू असतो. ‘प्रामाणिक माणसाला मोबाईल बंद ठेवायची गरज नसते. ज्यांना आपली गरज आहे, ते बोलावून घेतात,’ हा त्यांचा आत्मविश्वास खूप काही सांगून जातो.मामांचे अन्नदान जेसीबी मामा दरवर्षी कष्टातून मिळालेल्या कमाईतून अन्नदान करतात. कमाईतील काही हिस्सा दान करावा, यामुळे मानसिक समाधान मिळते. अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणून मी दरवर्षी अन्नदान करतो, असे ते सांगतात.
अंबकचे ‘जेसीबी मामा’ खुदाईकामात पारंगत
By admin | Updated: March 13, 2015 23:54 IST