कवठेएकंद : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने प्रभावीपणे काम करावे. ग्राम समितीच्या कामात हलगर्जीपणा दिसल्यास शासनाकडून ग्राम समितीवर व सदस्यावर कारवाई होऊ शकते. गावाच्या व समाजाच्या सुरक्षेसाठी ग्राम समितीने प्रामाणिक काम करावे, अशा कडक सूचना जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी केली.
कवठेएकंद , ता. तासगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी दीक्षित गेडाम बोलत होते. तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, गटविकास अधिकारी दीपा बापट, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, तालुका आरोग्य अधिकारी अनिल सूर्यवंशी, आरोग्य विस्तार अधिकारी प्रदीप शिरोटे आदी उपस्थित होते.
दीक्षित गेडाम म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रभागवार समिती, स्वयंसेवक त्यांचे सहकार्य घ्यावे. समित्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. दुजाभाव करू नये. आपत्ती समितीने काम न केल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल. अशी वेळ येऊ देऊ नये. लसीकरणाचा उपक्रमही चांगल्या पद्धतीने हाताळून लोकांना लसीकरणाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाबरोबरच ग्रामीण समित्यांनी काम करावे.
तहसीलदार कल्पना ढवळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच राजेंद्र शिरोटे, उपसरपंच शर्मिला घाईल, ग्रामविकास अधिकारी पी. टी. जाधव, तलाठी सचिन इंगोले, पोलीसपाटील वैभव पाटील, पंचायत समिती सदस्य संतोष आठवले, तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, आरोग्यसेविका सारिका पाटील आदी उपस्थित होते.