विकास शहा--शिराळा तालुक्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाने हैराण झाला असतानाच, वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना आता बिलाचा झटका बसत आहे. वीज कंपनीने एका शेतकऱ्याला घरगुती वापरापोटी हजार, दोन हजार नव्हे, तर तब्बल दीड लाख रुपयांचे वीजबिल दिले आहे. येथील महादेव ज्ञानू नलवडे (रा. शिराळा) हे सामान्य कुटुंबातील शेतकरी आहेत. त्यांच्या घरामध्ये चार ट्यूब, टीव्ही व फ्रीज ही उपकरणे आहेत. त्यांचा आजअखेर वीज वापर ६० युनिटच्या घरातच आहे. मात्र नाव्हेंबर २०१५ च्या बिलामध्ये ९१५१ युनिट आणि त्याचे बिल १ लाख ४६ हजार ७८० रुपये आले आहे. सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याने एवढ्या बिलाची रक्कम आणायची कुठून?, असा सवाल नलवडे करीत आहेत. हे बिल वीज वितरणकडून दुरुस्त करुन घेतले, पण ४६ हजार ५४० रुपयांपर्यंतच कमी करून देण्यात आले आहे. परंतु एवढीसुद्धा रक्कम आणणार कुठून?, हाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मीटरचा दोष असेल तर मीटर बदलण्याची जबाबदारी कंपनीची आहे. पांडुरंग महादेव नांगरे यांचे २४ हजार ५१०, तर दिलीप रघुनाथ नलवडे यांचे २४ हजार तीनशे, अशी एक महिन्याची बिले देण्यात आली आहेत. कंपनीमार्फत चुक ीची बिल आकारणी करून ग्राहकांना का वेठीस धरले जात आहे? जर मीटरमध्ये दोष असेल तर, कंपनीने ही मीटर बदलणे गरजेचे आहे. मात्र ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. टेस्ट रिपोर्टसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यापासून सुटका होणार, की वीज बिलासाठी आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची? असा सवाल शेतकऱ्यांकडून प्रशासनाला विचारला जात आहे. ग्राहकांनाच मिळतो सल्ला...कंपनीमार्फत मीटरचे छायाचित्र काढले जाते. हे छायाचित्र या बिलावर छापलेही जाते. मात्र मीटरचा दोष आहे की छपाईचा दोष आहे, याचीही तपासणी केली जात नाही. आहे त्याच परिस्थितीत बिल वितरित केले जाते. बिलामध्ये काही चुका असल्या, तर ग्राहकाला कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात. यावेळी अधिकारीवर्ग उपस्थित असले तर ठीक, नाही तर पुन्हा हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नसतो. बिलामधील दुरुस्ती दाखवली तरी, अधिकारी मात्र आहे ते बिल भरा,नंतरच्या बिलामध्ये बघून घेऊ, असा सल्ला देतात.
अबब... घरगुती विजेचे बिल दीड लाख रुपये!
By admin | Updated: December 14, 2015 00:07 IST