विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने विटा शहरात आज, शुक्रवारपासून ७ दिवसांचा जनता कर्फ्यू लागु केला आहे. याची घोषणा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी गुरुवारी विटा येथे पत्रकार परिषदेत केली.
या सात दिवसांत औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असून व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
वैभव पाटील म्हणाले, खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ग्रामीण भागातून लोक शहरात येत असतात. त्यामुळे उर्वरित तालुक्यातदेखील जनता कर्फ्यू लावणे गरजेचे आहे. या जनता कर्फ्यूमध्ये कोणी दुकाने उघडण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सकाळी ७ ते ११ या वेळेत शहरात मोठी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीमुळे विटा शहरासह तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा आता प्रतिदिन सुमारे २५० वर जाऊन पोहोचला आहे. शहरासह तालुक्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विट्यात शुक्रवार (दि. ३० एप्रिल)पासून ७ दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चौकट
जिवापेक्षा मोठे काही नाही
सुरुवातीला आम्ही आवाहन करीत आहोत; परंतु त्याचा गैरफायदा घेऊन कोणी दुकाने सुरू ठेवली तर सुरुवातीला एक-दोनदा समजावून सांगितले जाईल. मात्र, तरीही कोणी मुद्दाम अशा चुका पुन्हा करीत असेल तर मग त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत विटेकरांच्या जिवापेक्षा आपल्याला मोठे काही नाही, असे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले.