क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकाविण्यासाठी खेळाडूंचे प्रयत्न सुरू असतात. सर्व कसोट्यांतून गेल्यानंतर खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळतो. हा सन्मान मिळविल्यानंतर आणि मैदान सोडल्यावर नोकरीअभावी या खेळाडूंची आर्थिक कोंडी होते. अनेक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आज रंगकामासह शेतमजुरीची कामे करीत आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्र व क्रीडा चळवळीत बाधा येत आहे. राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंना त्यांच्या पात्रतेनुसार शासकीय सेवेत नोकरी देण्याची खेळाडूंची मागणी आहे. याबाबत गेल्या वर्षी शिवजयंतीस मागणी केल्यानंतर शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, अद्याप एकालाही नोकरी मिळालेली नाही. आता यंदाच्या शिवजयंती म्हणजे दि. १९ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर दि. २० फेब्रुवारीला राज्यातील ३२ खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार परत करणार आहेत. हे सर्व खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित आले आहेत. याबाबतचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे.
राज्यातील ३२ खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार करणार परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST