नरवाड : म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडून पाणीवाटपाची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. ओढ्या, नाल्याने पाणी सोडले जाते. यातील काही पाणी कर्नाटकातही जात आहे. या पाण्याची आम्ही पाणीपट्टी का भरायची, असा सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पाण्याच्या मोजमापाची कोणतीही यंत्रणा नसताना घनफुटाला ३० हजार पाणीपट्टीची शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून सक्ती केली जात आहे. शेतकऱ्यांनी एकरी पाणीपट्टी आकारण्याची मागणी होत आहे.
मिरज पूर्व भागातील म्हैसाळ प्रकल्पातून पाणी घेण्याच्या पाटबंधारेच्या जाचक अटींमुळे पाणी मागणीला खो बसत आहे. २०२० ते २१ या सिंचन वर्षातील उन्हाळी हंगामातील पाणी आवर्तनाचे कृष्णा खोरे महामंडळाकडून नियोजन सुरू आहे. याविषयी म्हैसाळ पंपगृह उपविभाग क्र. दोनकडून संबंधित मिरज पूर्व भागातील गावांना लेखी कळविले आहे. या नोटिसीत म्हैसाळ प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम पाणी मागणी अर्ज नमुना ७ भरून मागणी करावी लागणार आहे. सिंचनाची उन्हाळी हंगामाची पाणीपट्टी प्रति
दशलक्ष घनफूट ३० हजार रुपये इतकी आहे.
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी पाटबंधारेचे काम अद्याप अपूर्ण असताना पाण्याची मोजणी दशलक्ष घनफुटात करणे हे अन्यायकारक असल्याच्या शेतकऱ्यांतून प्रतिक्रिया आहेत.
ज्याठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी पाणी ओढे-नाल्यातून न्यावे लागते त्याठिकाणी पाणी कसे मोजणार?
कारण बांधापर्यंत पाणी येताना जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे मोजमाप कोण करणार?
त्याचेही खापर पाटबंधारेने शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारल्याने शेतकरी पाणी मागणी अर्ज भरण्यास सरसावत नसल्याचे चित्र आहे. पाटबंधारेने पाणी मागणी अर्ज एकरावर भरून घेतले पाहिजेत, तरच शेतकरी अर्ज घेण्यासाठी पुढे येणार आहेत.
पाण्याच्या पातळ्यांनी तळ गाठला असताना पाटबंधारेने टाकलेल्या जाचक अटींची गुगली मागे घेऊन शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. याबाबत प्रगतिशील शेतकरी विश्वभूषण पाटील यांना विचारले असता, पाटबंधारेने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविल्यास प्रति दशलक्ष घनफुटात पाणीपट्टी आकारण्यास काहीच गैर नाही. मात्र, अशी कुठलीही सोय पाटबंधारेने केली नसल्याने पाण्याची एकरावरच मोजदाद करण्याचे मत व्यक्त केले.