इस्लामपूर : समाजातील वयोवृद्ध, विधवा महिला तसेच अपंग आदी घटकांनी संजय गांधी निराधार योजना समितीकडे अर्ज करावेत. योग्य व गरजूंचे अर्ज तातडीने मंजूर करण्यात येतील. या कामासाठी वशिला किंवा मध्यस्थांची गरज नाही, अशी माहिती संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. योजनेच्या बैठकीत १८४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची बैठक झाली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार धनश्री भांबुरे उपस्थित होते. या बैठकीमध्ये १९५ प्रस्तावांपैकी १८४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे १२६, श्रावणबाळ योजनेचे ५७ प्रस्ताव, तर इंदिरा गांधी अपंग योजनेच्या एका प्रस्तावाचा समावेश आहे.
या बैठकीस समितीचे सदस्य रामभाऊ पाटील, युवराज कांबळे, दिनकर धोंडी पाटील, संदीप माने, राहुल टिबे, सुहास रुगे, प्रणिती पेठकर, हेमंत पाटील, इलियास नायकवडी उपस्थित होते.