इस्लामपूर : येथील उरुण परिसरातील आयएसओ मानांकित उदय नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष विठ्ठलराव जाधव यांनी केली.
संस्थेची ४० वी वार्षिक सभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ज्येष्ठ सभासद रामचंद्र मुरारी जाधव, प्रा. भगवंतराव जाधव यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपाध्यक्ष प्रा. बी. आर. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविकात संस्थेच्या कामाचा आढावा घेतला.
अध्यक्ष जाधव म्हणाले, संस्थेकडे ११ कोटी ५१ लाखांच्या ठेवी असून, ७ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ५ कोटी ७८ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. संस्थेसे १९ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेने पूरग्रस्त व कोरोनाकाळात शासनाकडे मदत दिली आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची परंपराही जपली आहे.
व्यवस्थापक अनंत उबारे यांनी नोटीस वाचन व आर्थिक पत्रकांचे वाचन करून २०२०-२१ च्या अंदाजपत्रकाची माहिती दिली. नीलम अर्जुन पन्हाळे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक बाबासाहेब पवार यांनी आभार मानले.