रत्नागिरी : दरवर्षी टंचाई कृती आराखड्यामध्ये घेण्यात येणाऱ्या विंधन विहिरींच्या कामांना यंदा छेद देण्यात आला आहे. यापुढे जिल्हा नियोजन समितीतून विंधन विहिरी खोदाईच्या कामांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी विंधन विहिरींच्या मंजुरीबाबत होणारी ओरड कमी होणार आहे. जिल्ह्याच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यास उशीर होत असल्याने ग्रामीण, डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या वाड्या, वस्त्यांसाठी ते त्रासदायक ठरत होते. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी लवकरच टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे जिल्ह्याच्या १९० गावांतील ४७६ वाड्यांना टँकरने पुरवठा करण्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी १ कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्तांसाठी पावणेतीन कोटी रुपये खर्च करर्णयात येणार आहे.या आराखड्यामध्ये २९ गावांतील ३९ वाड्यांतील नादुरुस्त ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या नळपाणी योजना दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी १ कोटी १२ लाख रुपये एवढ्या खर्चाची तरतूद करण्यात आली. असा एकूण २ कोटी ७६ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वच ठिकाणी विहीर खोदाई करणे परवडणारे नाही. त्यासाठी विंधन विहिरी खोदाई हा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. विहिरींच्या खोदाईसाठी मनुष्यबळ तसेच खोदाईचा खर्चही जास्त होतो. त्यासाठी विंधन विहिरी खोदाई करण्यात येत आहे. विहिरींपेक्षा या विंधन विहिरींवर खर्च कमी येत असल्याने अगदी कमी जागेतही त्यांची खोदाई करता येते. त्यामुळे आता जिल्ह्यात विहिरींऐवजी विंधन विहिरी खोदाई करण्यात येत आहेत. गतवर्षीपर्यंत या विंधन विहिरी टंचाई कृती आराखड्यातून घेण्यात येत होत्या. मात्र, यंदा त्या या आराखड्यातून घेण्यात आलेल्या नाहीत. त्या यापुढे जिल्हा नियोजन मंडळातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे विंधन विहिरींच्या मंजुरीसाठी टंचाई कृती आराखड्याची वाट पाहावी लागणार नाही. गेल्यावर्षी टंचाई कृती आराखड्यात विंधन विहीरींचा समावेश करण्यात आला होता.हा आराखडा उशिरा सादर करण्यात आल्याने त्याला मंजुरी उशिराने मिळाली. त्यामुळे कामे रखडली होती. मात्र नवीन निर्णयामुळे टंचाई कृती आराखड्याची वाट बघावी लागणार नाही. (शहर वार्ताहर)गेल्या वर्षी मंजुरीच नव्हती...गेल्या वर्षी टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये १६३ विंधन विहिरींच्या खोदाईचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्या विंधन विहिरींची खोदाई करण्यापूर्वी त्यांचे संरक्षण करण्यात आले. यामध्ये १२६ विंधन विहिरी खोदाई करण्यास योग्य, तर विविध कारणांनी ३७ विंधन विहिरी खोदाई करण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हा प्रशासनाला ६२ गावांतील ६९ वाड्यांमधील ६९ विंधन विहिरींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्ह्यात टंचाई असतानाही त्यांना मंजुरी मिळाली नव्हती.
विंधन विहिरी ‘नियोजन’मधून
By admin | Updated: February 2, 2015 00:05 IST