रत्नागिरी : शहरातील महात्मा गांधी रोड येथे उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या कामात विकासकाकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते समीर तिवरेकर व नगरसेवक राजेश तोडणकर यांनी केला. रोड वायडिंगच्या जागेतच महावितरणचे रोहित्र उभारून संकुलाच्या पायऱ्या केल्या जात असल्याचे सांगितले.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या विशेष सभेत नगरसेवक तोडणकर व तिवरेकर यांनी तक्रार केल्यावरून, नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी तत्काळ रोहित्र रस्त्यातून हटविण्याचे आदेश विकासकाला देण्याची सूचना करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले.
नियमानुसार, दीड मीटरचे रोड वायडिंग आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्ता अरुंद आहे. राेड वायडिंगमध्ये विकासकाकडून रोहित्र व संकुलाच्या पायऱ्या उभारल्या जात असल्याचा आरोप दोन्ही नगरसेवकांनी केला. या मार्गावरून एकादशीच्या यात्रा, विविध उत्सव, विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. रस्ता कमी केल्यास व रोहित्र रस्त्यात बसविल्यास भविष्यात दुर्घटना घडू शकते.