आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विद्याधर (आप्पा) राजाराम कदम यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सलग अकराव्यांदा एकमताने निवड करण्यात आली.
कोरोना काळात केलेले अतुलनीय कार्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून गेली १० वर्षे गावातील तंटे गावातच मिटविण्याचे केलेले काम आणि आबलोली ग्रामपंचायत निवडणूक विनातंटा, कोणतेही राजकारण होऊ न देता सर्व समाज घटकांना सामावून घेऊन बिनविरोध करण्याचे काम मागील कित्येक वर्षे ते करत आले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामसभेने सलग ११ व्या वेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड केली आहे.
आबलोली ग्रामपंचायतीचे सरपंच तुकाराम पागडे यांनी सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी सोबत ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, आशिष भोसले, मीनल कदम, भारती कदम, मुग्धा पागडे, साक्षी रेपाळ व ग्रामसेवक बाबूराव सूर्यवंशी, उद्योजक सुभाष काजरोळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उल्हास काळे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.