रत्नागिरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही लाॅकडाऊन करायचे का, याबाबत पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याशी गुरुवारी सांगोपांग चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय हाेईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी ऑनलाइन घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा प्रशासनासोबत आयोजित ऑनलाइन बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यातील २० पेक्षा अधिक जिल्हे लाॅकडाऊनमध्ये आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सोमवारपासून लाॅकडाऊन सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीतही वेळ पडल्यास लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल, याबाबत गुरुवारी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्यासोबत गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा होईल आणि वेळ पडल्यास लाॅकडाऊन करावाच लागेल. मात्र, यासाठी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सर्व घटकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. मात्र, वेळ पडल्यास लाॅकडाऊन करावे लागेल, याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला.
सध्या कोविड परिस्थितीचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या बैठकीत लाॅकडाऊनबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊन होईलच असे नाही. मात्र, वेळ आली तर लाॅकडाऊन करावेच लागेल. आजही कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे वेळ पडल्यास लाॅकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज भासणार आहे. सर्व पक्षघटकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री सामंत यांनी यावेळी केले.
राज्याच्या स्वतंत्र ॲपची मागणी
जिल्ह्यात सर्वांना लसीकरण तेही मोफत केले जाणार आहे. साेमवारी २८,७०० लसीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध झाले आहेत. लसीचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोविशिल्डचे २० हजार डोस मिळाले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी सध्या केंद्राचे ॲप नोंदणीसाठी वापरले जात असल्याने गाेंधळ होत आहे. त्यामुळे राज्याचे ॲप तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
उपकेंद्र स्तरावर लसीकरण
सध्या लसीकरणासाठीची गर्दी लक्षात घेऊन उपकेंद्र स्तरावरही लसीकरण करता येइल, अशी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.