रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळील चरवेली येथील वळणावर मंगळवारी रात्री १२.३०च्या दरम्यान कार उलटून तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
याबाबतची माहिती अशी की, एमएच ०८, झेड ८८५८ ही कार कणकवलीहून रत्नागिरीकडे चालली होती. ती रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथील वळणावर उलटून अपघात झाला. या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. लोकांच्या मदतीने जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सुधीर विश्वनाथ वेल्हाळ (५८), प्रियंका सुधीर वेल्हाळ, (५५), सुलभा विश्वनाथ वेल्हाळ (८०) यांचा समावेश आहे. हे सर्व जखमी कारवांचीवाडी (ता. रत्नागिरी) येथील राहणारे आहेत.