राजापूर : अर्जुना नदी खोरे समृद्ध अभियानांतर्गत नदीकाठच्या २८ गावांच्या विकासासाठी तयार केलेला १ कोटी रुपयांच्या आराखड्यात निधीची तरतूदच न झाल्याने एका चांगल्या अभिनयाला खीळ बसली आहे.तालुक्याची जीवनदायी ठरलेली अर्जुना नदी पूर्व परिसरात अणुस्कुरा घाटाच्या कुशीत उगम पावते व नंतर ती पश्चिमेला अरबी समुद्रात जावून मिळते. जवळपास ७० ते ७५ कि. मी. तिचा प्रवास असून, तिच्या उभय काठावर सुमारे २८ गावे येतात. त्यामध्ये करक, पांगरीखुर्द, कारवली, पाटकरवाडी, पाचल बाजारवाडी, पेठवाडी, रायपाटण, टक्केवारी, बागवेवाडी, गांगणवाडी, येळवण, कोळवणखडी, मुसलमानवाडी, ठिकाणकोंड, उन्हाळे, दोनिवडे, शीळ, कोंड्येतर्फे राजापूर, परटवली, गोठणे दोनिवडे, हातवकरवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, मळेवाडी, आंगले, फुफेरे अशा गावांचा समावेश आहे.अर्जुनाच्या पुनरुज्जीवनातून तिच्या काठालगतच्या या सर्व गावांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता व त्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडाही तयार करण्यात आला. तथापि, शासनाकडून या आराखड्यासाठी अद्यापही आवश्यक निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही. यापूर्वी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात त्याबाबत तरतुदीची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. (प्रतिनिधी)शासनाच्या वाटाण्याच्या अक्षता...अर्जुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. त्यासाठी जागतिक कीर्तीचे जलपुरुष व मेगॅसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांनाही तालुक्यात आणण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा करुन देण्यात आला. पण एवढे होऊनही शासन मात्र उदासीनच राहिले आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेडमध्ये नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी अपूर्ण पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यालाच शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
एक कोटीचा आराखडा अन् दमडीचीही नाही तरतूद!
By admin | Updated: May 31, 2016 00:35 IST