दाभोळ : जनतेच्या सोयीसाठी दाभोळ ग्रामपंचायतीच्यावतीने गावात सौरऊर्जा पथदिवे लावण्यात आले होते. त्यातील सात सौरऊर्जा पथदिव्यांच्या बॅटऱ्यांची चोरी झाल्याची तक्रार सरपंच डॉ. आनंद गोंधळेकर यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तब्बल सात जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्यावर भादंविक ४११, ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यातील आरोपींची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली असून, खरे गुन्हेगार मात्र अद्याप मोकाट फिरत असल्याची गावात चर्चा सुरु झाली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधु शिंदे यांनी योग्य तऱ्हेने तपास करुन गुन्हेगारांना अटक केली. आरोपींनी पोलिसांना नावे सांगूनही पोलिसांचा तपास त्यांच्यापर्यंत जात नसल्याने पोलिसांच्या तपासाबाबत सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गावातील सरकारी मालमत्तेची सर्वात मोठी व धाडसी चोरी म्हणून या घटनेकडे पाहिले जाते. बॅटऱ्या चोरल्याने दाभोळ गावचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या चोरीच्या मुळापर्यंत जाऊन पोलिसांनी तपास करणे महत्त्वाचे आहे.यामध्ये मोठे रॅकेट असून खरे गुन्हेगार कोण आहेत हे जनतेला कळलेच पाहिजे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास होत नाही, असे जनतेच्या निदर्शनास येत आहे. सौर पथदीप बॅटऱ्यांच्या चोरीबाबत वेळीच तक्रार दाखल झाली नसती, तर दाभोळ गावात मोठा दरोडाच पडला असता आणि एखादवेळ जीवितहानी करण्यापर्यंत मजल गेली असती. त्यामुळे दाभोळ गाव चांगलेच बदनाम झाले असते. दाभोळ ग्रामपंचायतीच्या वतीने सौरऊर्जेवरील एकूण ६0 पथदिवे बसवण्यात आले असून, सौरऊर्जेवरील दिव्यांच्या पन्नास बॅटऱ्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहेत. त्यातील सात बॅटऱ्यांची चोरी झाल्याची तक्रार दाखल असून, तीन बॅटऱ्या चोरीस गेल्याची तक्रार दाखल झालेली नाही. पोलीस याबाबत कसा तपास करतात, हे येणारा काळच ठरवणार आहे. (वार्ताहर)
सौरऊर्जा बॅटऱ्या चोर अद्याप मोकाट
By admin | Updated: December 5, 2014 23:18 IST