राजापूर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक तर ११ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, सर्वच पक्षीय आपापले उमेदवारी अर्ज सादर करण्यात गुंतले आहेत. ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून आरक्षित प्रभागातील उमेदवारांसहित महिलांची शोध मोहीम जोरात सुरु आहे. तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पाडण्याच्यादृष्टीने तयारी सुरु आहे.तालुक्यात एकूण १०१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५० टक्के म्हणजे ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महिन्यात पार पडत आहेत. त्यामध्ये शिवणे खुर्द, गोवळ, धोेश्वर, शीळ, ओणी, कोंडीवळे, कोदवली, देवाचे गोठणे, चिखलगाव, चुनाकोळवण, मंदरुळ, हातदे, करक, पांगरी खुर्द, हरळ, कारवली, येरडाव, मिळंद, जवळेथर, काजिर्डा, कोळंब, फुफेरे, ओशिवळे, सौंदळ, कशेळी, सोलगाव, आंबोळगड, वाडापेठ, कोंडसर बु., उन्हाळे, मोरोशी, पन्हळेतर्फे सौंदळ, वालये, पांगरे बु., दोनिवडे, ससाळे, महाळुंगे, तळगाव, मोसम, अणसुरे, निवेली, दळे, कुवेशी, कुंभवडे, तारळ, पडवे यांचा समावेश आहे तर देवाचे गोठणे, कोतापूर, वडवली, खरवते, वडदहसोळ, पडवे, कोळवणखडी, आंगले, साखरीनाटे, मोगरे व कोंड्येतर्फे सौंदळ अशा ११ ग्रामपंचायती अंतर्गत पोटनिवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे तालुक्यात ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत, तर २२ एप्रिलला मतदान पार पडेल. यामुळे तालुक्यातील विविध राजकीय पक्षांची लगबग सुरु आहे. राजापुरात प्रामुख्याने शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांकडे जास्त ग्रामपंचायती आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादीकडे ग्रामपंचायती आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे मात्र तालुक्यात खाते शून्य आहे. मनसेसह आरपीआयचीदेखील परिस्थिती अशीच आहे.प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत आरणिातील स्त्री, पुरुष उमेदवारांचे जात प्रमाणपत्रासाठी आता धावपळ सुरु आहे. गतवेळी काही ठिकाणी आरक्षणांतर्गत जातीचे प्रमाणपत्र नसल्याने काही ठिकाणच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. तशी वेळ यावेळी येऊ नये म्हणून अनेक राजकीय पक्षांनी ती खबरदारी घेतली आहे. स्थानिक पातळीवरील विकास प्रचारादरम्यानचा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे.गावांतर्गत असलेली शांतता सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी बिनविरोध पार पडाव्यात यासाठी गावोगावच्या तंटामुक्त समित्या सरसावल्या असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. जिल्हापरिषदेसह पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण निवडणुकमय बनू लागले आहे. (प्रतिनिधी)
आरक्षित जागांसाठी पक्षांच्या दाही दिशा
By admin | Updated: April 3, 2015 00:46 IST