गुहागर : एन्रॉन प्रकल्प येथे येण्यामागे तत्कालीन मंत्री पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा मोठा हात आहे. प्रकल्पामध्ये पक्ष कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे, हे खपवून घेणार नाही. पुढील महिन्यात गुहागर दौरा करून येथील पदाधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाला भेट देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पाटपन्हाळे येथे पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते.
सुनील तटकरे म्हणाले की, महाराष्ट्राला भविष्यात होणारा विजेचा तुटवडा लक्षात घेऊन शरद पवार यांनी एन्रॉन प्रकल्प आणला. याला प्रखर विरोध झाला. मात्र, त्यानंतरच्या काळात आज प्रकल्प नसण्याने व आज प्रकल्प आहे याचे फायदे-तोटे स्थानिकांच्या लक्षात आले आहेत. महिनाभरापूर्वी प्रकल्प अधिकाऱ्यांनी एका कामासंदर्भात माझ्याकडून शिफारस पत्र घेतले होते. खासदार म्हणून प्रकल्पाला मदत करणे माझे काम आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्पामध्ये कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक दिली जाते हे मी कधीच खपवून घेणार नाही, असे सांगितले.
तटकरे पुढे म्हणाले की, कोविडच्या नावाखाली केंद्र सरकारने महाराष्ट्राचा निधी कमी केला, हक्काचा जीएसटी अद्याप दिलेला नाही. तरीही पुढील काळात जास्तीचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. आघाडी सरकार असल्याने तालुका पातळीवर चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा समन्वय समित्यांमध्ये संधी मिळेल, याबाबत पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर मितभाषी असले, तरी अपेक्षेपेक्षा मोठा झालेला मेळावा हे त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता माजी पंचायत समिती सभापती संपदा गडदे यांनी काम केले. यातूनच त्यांना कोविडची बाधा होऊन मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने पक्षांमध्ये सामाजिक पोकळी निर्माण झाल्याचे तटकरे म्हणाले.
यावेळी माजी आमदार रमेश कदम, संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, पद्माकर वालेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चित्रा दाभोळकर, राजेश आंब्रे, मंदार कचरेकर, जगदीश गडदे, जयंत खताते, वैभव वेल्लाळ, रामचंद्र हुमणे उपस्थित होते.
--------------------
असाही सूचक इशारा
गुहागर नगराध्यक्ष राजेश बेंडल हे आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आले आहेत. बेंडल इकडेतिकडे गेलात मी काही बोललाे नाही. आठ ते दहा दिवसात पुण्याला या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करा, असा सूचक इशारा सुनील तटकरे यांनी दिला.