रत्नागिरी : येथील हेल्पिंग हँडस्च्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर उत्तम प्रतिसादात पार पडले. शहराच्या जयस्तंभ भागातील गीता भवन येथे बुधवारी (दि. ८) हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी या शिबिराला भेट देऊन कार्यकर्त्यांचे व रक्तदान करणाऱ्यांचे कौतुक केले.
जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर सर्वच रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या विविध रुग्णांची संख्या लक्षात घेता, सध्या या रुग्णालयात विविध गटांच्या रक्ताची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या कोरोनाने बाधित होणाऱ्यांची वाढती संख्या आणि लसीकरण प्रक्रिया याचा परिणाम रक्तसंकलनावर होत आहे. अनेक दाते कोरोनाबाधित झाले. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांच्या आत रक्तदान करता येत नाही. तसेच पहिला किंवा दुसरा कोरोना प्रतिबंधक डोस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या आत रक्तदान करता येत नाही.
सध्या बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, सध्या लसीकरणाचा वेग जिल्ह्यात वाढला आहे. त्यामुळे १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. त्यामुळे या दात्यांना इच्छा असूनही १४ दिवसांच्या आत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्याही घटली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीला सध्या रक्तगटांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासू लागला आहे.
त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसिस शस्त्रक्रिया, अपघाती रुग्ण, विविध शस्त्रक्रिया, प्रसूती, थॅलेसिमिया, हिमोफिलियाचे रुग्ण, आर्थिक दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक रुग्ण, आदींना पुरवठा करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे हेल्पिंग हँडस्च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गीता भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यात कार्यकर्त्यांनीही रक्तदान केले. रक्तदात्यांना हेल्पिंग हँडस्कडूनही प्रमाणपत्र देण्यात आले.
जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने हेही होते. यावेळी डाॅ. पाटील यांनी हेल्पिंग कार्यकर्त्यासाेबत विविध समस्यांवर चर्चा केली.