खालगाव : रत्नागिरीच्या एम. एस. नाईक स्कूलमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय बालविज्ञान परिषदेत पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटदची सायली पारकर आणि खेर्डीची साक्षी सुतार यांचे प्रकल्प उल्लेखनीय ठरले आहेत. त्यांच्या सोबत नाईक हायस्कूलचा सोबन होडेकर, वरवडे हायस्कूलची प्राची निवळकर आणि खेर्डी (ता. चिपळूण)ची प्रेरणा गमरे यांनीही आपल्या प्रकल्पांचे उल्लेखनीय सादरीकरण केले.आश्रय सेवा संस्था या जिल्हा समन्वयक संस्थेने जिल्हा विज्ञान मंडळाच्या सहकार्याने आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या बालविज्ञान परिषदेचे उद्घाटन एम. एस. नाईक स्कूलचे पर्यवेक्षक आणि बालविज्ञान परिषदेचे माजी बालवैज्ञानिक अकिब काझी यांच्याहस्ते झाले. यावेळी समन्वयक संस्थेचे अध्यक्ष अरूण मुळ्ये व जिल्हा समन्वयक संजय मुळ्ये उपस्थित होते. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक सुयोग सावंत आणि सुमेध मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. या प्रकल्पातून पाच प्रकल्पांची नोव्हेंबरमध्ये पुणे येथे आयोजित केलेल्या विभागीय फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.विभागीय फेरीसाठी निवडण्यात आलेल्या आणि उल्लेखनीय ठरलेल्या प्रकल्पांमध्ये खंडाळ्याच्या पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाच्या सायली पारकर हिने टेस्टिंग आॅफ इमिशन्स फ्रॉम टू व्हिलर्स आणि नाईक स्कूलच्या होडेकर याने बायोफिक्सेशन बाय अल्गी हे पर्यावरण प्रदूषणाशी निगडीत प्रकल्प सादर केले. तसेच वरवडे हायस्कूलची प्राची निवळकर हिने सर्वत्र दुर्लक्षित अशा टाकळा या झाडाचे इकोफ्रेंडली नेचर दाखवण्याचा प्रयत्न केला. खेर्डी हायस्कूलच्या साक्षी सुतारने वर्मी वॉश तयार केले, तर याच शाळेच्या प्रेरणा गमरे हिने युरिनपासून आॅरगॅनिक खत तयार केले होते. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी आश्रय सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, नाईक स्कूलचे सर्व सहकारी आणि शिवाजी पाटील यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)
रत्नागिरीचे दोन प्रकल्प विभागीय पातळीवर
By admin | Updated: October 30, 2015 23:17 IST