चिपळूण : जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. रमेश कदम हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आपल्याच पक्षाच्या बँकेबाबत आरोप करताना आपण या बँकेकडून कर्ज घेतले होते. त्याचे पुढे काय काय झाले ते जनतेला सांगा. ज्यांनी बँकेकडून लाभ घेतला त्यांनी बँकेवर बोलू नये. त्यांनी चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादी संपवून आता बँकेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी लावताना २० लाख रुपये संचालकांनी घेतले, असा आरोप कदम यांनी केला होता. कदम यांना वर्षभरांनी साक्षात्कार झाला. यापूर्वी अनेकांनी अनेक आरोप केले. पण एकानेही पुरावा दिला नाही. आता वर्षभरानंतर त्यांचा कोण तरी घेतला नाही म्हणून यांना जाग आली आहे. बँकेत १२ ते १५ हजार पगार मिळणारा कर्मचारी २० लाख रुपये कसा फेडणार? याचे व्याज ३ लाख रुपये होते. आयुष्यभर नोकरी करुनही २० लाख फिटणार नाहीत. बँकेची निवडणूक आली म्हणून यांना हे उद्योग सुचले आहेत. इतरांवर आरोप करताना स्वत:चा इतिहास पाहावा. इतकेच काय तर तक्रारदाराला घेऊन सरळ पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी दाखल करावी. पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धी व बदनामी कशासाठी? कोणी सुपारी तर दिली नाही ना? असा संशय चोरगे यांनी व्यक्त केला आहे. बँक प्रगतीपथावर आहे असे नाबार्ड, सहकार खाते सांगते. लेखी आॅडीट आहे. बँकेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. सीबीएस आहे. एटीएम बसवणे सुरु आहे. एलपीए शून्य आहे. १४०० कोटीपर्यंत ठेवी आहेत. ८५० कोटींचे कर्ज दिले आहे. असे असताना माजी आमदार कदम यांनी नोकरीत घ्या म्हणून जी चार नावे सुचवली ती नापास झाली. त्याला बँक संचालक काय करणार? ऐन निवडणुकीच्या तोंडावर संचालकांना व बँकेला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. बदनामी करण्यापेक्षा सबळ पुरावा घ्या व गुन्हा दाखल करा. आपल्याच पक्षाच्या लोकांवर आरोप करुन पक्ष नाहीसा करण्याचे काम सुरु आहे हे खेदजनक आहे. भैरीसमोर उभे राहून फुल उचलून खोटे बोलणारे भैरीने पाहिले आहेत त्यापेक्षा गुन्हाच दाखल करा. बँकेची प्रगती झाली की नाही हे जनतेला कळेल, असे आव्हान चोरगे यांनी दिले आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकीत माजी आमदार कदम विरूध्द चोरगे असा संघर्ष सुरू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)