राजापूर : यंदाच्या पावसाळी हंगामात प्रथमच शनिवारी राजापूरला पुराने वेढले. शुक्रवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी सकाळपासूनच शीळ, गोठणेदोनिवडे परिसरात अर्जुना नदीच्या पुराचे पाणी भरले. त्यामुळे सकाळी त्या भागाकडून येणारी वाहतूक बंद होती. त्यामुळे तेथील जनतेची धावपळ उडाली . मागील आठवडाभर तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असून, शुक्रवारी सायंकाळपासून पावसान जोर धरला होता. तालुक्याच्या पूर्व विभागातही जोरदार पाऊस पडत होता. त्या भागातून वाहणाऱ्या अर्जुना नदीला बऱ्यापैकी पुराचे पाणी होते, तर कोदवलीकडून वाहणाऱ्या नदीलाही पाणी होते. अर्जुनाचे पाणी वाढल्यामुळे नदीकाठच्या गावातील रस्त्यावर पाणी साचले होते व त्याचा फटका तेथील लोकांना बसला. भर रस्त्यावरच पाण्याचा वेढा असल्याने चिखलगाव, गोठणेदोनिवडे, शीळ या गावांकडून येणारी सर्व वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी शाळेसह विद्यालय व महाविद्यालयात घरातून निघालेल्या विद्यार्थ्यांना जाताना खूपच धावपळ करावी लागली. नंतर पावसाचा जोर ओसरला व पुराचे पाणीदेखील कमी झाले व त्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. (प्रतिनिधी)
राजापुरात ‘अर्जुना’ला पूर
By admin | Updated: July 2, 2016 23:50 IST