रत्नागिरी : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत झालेल्या मतदानाची आकडेवारी ६७.२२ टक्के इतकी आहे. एकूण ८९,०१३ मतदारांपैकी ५९,८३५ मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मे ते आॅगस्ट २०१५ पर्यंत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापैकी खरवते येथील ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज न आल्याने निवडणुका नव्याने घेण्यात येणार आहेत. आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने उर्वरित ४२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान घेण्यात आले. निवडणूक रिंगणात ७२६ उमेदवार होते. ही निवडणूक ४२ ग्रामपंचायतींच्या १३४ प्रभागांकरिता घेण्यात आली. सध्या उकाड्याचे वातावरण असल्याने सकाळी आणि सायंकाळी उत्साहाने मतदान झाले. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात झाली. त्यावेळी पहिल्या दोन तासात मतदारांची लांबच लांब रांग दिसून येत होती. दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाचा ओघ असाच होता. त्यानंतर हळूहळू तो कमी होत गेला आणि दुपारच्या सुमारास अनेक मतदान केंद्रावर सुनसानी वातावरण होते. सायंकाळी ४ ते ५.३० यावेळेत पुन्हा मतदान प्रक्रियेने वेग घेतला. त्यामुळे प्रत्यक्षात तालुक्यात ६७.२२ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.तालुक्यातील एकूण १३५ मतदान केंद्रावर घेण्यात आलेले पहिल्या एक तासात कमी होते. त्यानंतर पुढील तीन तासात ते आणखीन वाढले. मिळालेल्या आकडेवारीनुसार, ७.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१.१५ टक्के इतके मतदान झाले होते, तर ५.३० पर्यंत ६७.२२ टक्के इतके मतदान झाले. एकूण ८९,०१३ मतदारांपैकी पुरूषांची संख्या २८,८४९ इतकी तर महिलांची संख्या ३०,९८६ इतकी आहे. उद्या शहरानजीकच्या कुवारबाव येथे सामाजिक न्याय भवन येथे सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीचिंंद्रवली, मिरजोळे, खेडशी, सडामिऱ्या, जाकीमिऱ्या, कर्ले, नाचणे, मजगाव, हरचेरी, चांदेराई, कुरतडे, खानू, नाणीज, पाली, दांडेआडोम, वरवडे, पावस, गोळप, भाट्ये, गावखडी, नाखरे, शिवारआंबेरे, डोर्ले, सोमेश्वर, कोतवडे, काळबादेवी, बसणी, जांभरुण, ओरी, नेवरे, गणपतीपुळे, कासारी, नांदिवडे, गडनरळ, कळझोंडी, वाटद, राई, देऊड, आगरनरळ, चाफे, पानवल, हातखंबा.
मतदान प्रक्रिया शांततेत
By admin | Updated: April 23, 2015 00:39 IST