रत्नागिरी : खते तसेच बियाणे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला शेताच्या बांधावर पोहोचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाच्या माध्यमातून आम्ही नियोजन करत असल्याची माहिती रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
गेल्या वर्षी ६४ - ६५ हजार हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावेळी ती किमान एक लाख हेक्टरपर्यंत करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. गेल्यावर्षी जी पडिक शेतजमीन होती, त्यामध्ये भात लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी भाताची नवीन बियाणी संघामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जी रासायनिक खते, सेंद्रिय खते आहेत, ती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला शेताच्या बांधावर पोहोचवण्याच्या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी - विक्री संघाच्या माध्यमातून नियोजन करत आहोत, असे ते म्हणाले.
यावर्षी पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले भात उत्पादन कसे वाढेल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. केंद्राकडून हमीभाव भात खरेदीची योजना सुरू आहे. यावर्षी साधारणतः २५०० ते २६०० रुपये क्विंटलला भाव मिळाला, पुढच्या वर्षी तो वाढावा, यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरवाढ झालेल्या खतांसाठी अनुदान मिळावे, यासाठी राज्यातील भाजपकडून केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.