रत्नागिरी : ‘महावितरण’ने वीज बिल वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. वीज बिले न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे धडक मोहीम तातडीने थांबविण्यात यावी शिवाय ग्राहकांना ठराविक कालावधीत वीज बिले भरण्यासाठी अवधी देण्यात यावा. त्यासाठी हप्ते द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी शहर शाखेतर्फे करण्यात आली आहे.
‘महावितरण’चे मुख्य अभियंता विजय भटकर यांना शहर राष्ट्रवादीतर्फे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, रामभाऊ गराटे, शहराध्यक्ष नीलेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, जिल्हा सरचिटणीस सचिन कोतवडेकर, रवी रूमडे, सानिफ गवाणकर, नागेश जागुष्टे, शफिक दर्वे, संदीप नार्वेकर, अमोल पावसकर, स्वप्निल मांडवकर उपस्थित होते.
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. आर्थिक संकटाचा सामना करत असतानाच काहींची वीज बिले भरली न गेल्याने थकबाकी वाढली असून त्यांना भरण्यासाठी अवधी देण्याची मागणी केली आहे.