रत्नागिरी : आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा जिल्ह्यासाठी उपयोग करून चिपळूण येथील लोटे एमआयडीसीमध्ये हिंदुस्थान पेपर मिल आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २४०० कोटींचा हा प्रकल्प जिल्ह्यात सुरू झाल्यास बांबू लागवड करणाऱ्यांना ते फायदेशीर ठरेल. तसेच येथील एक हजार लोकांना प्रत्यक्ष, तर दहा हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी आज, शनिवारी येथे दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या दक्षता संनियंत्रण समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर असून, टप्पा दोनसाठीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी योजना दिलेल्या आहेत. या योजना पाणी पिण्यासाठी किंवा वापरासाठी योग्य नसेतील, तर त्या गावासाठी दुसरी योजना करता येईल, असा आज निर्णय झाला आहे. केळशीसाठी (ता. दापोली) अशी योजना मंजूर करण्यात आली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या योजना अतिशय चांगल्या आहेत. मात्र, केंद्राबाबतचे निकष बदलणे गरजेचे असल्याने तसा ठराव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यासाठी २०१४ - १५ साठी १९ कोटी रुपये आले होते. ते पूर्ण खर्च झाले आहेत. जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण वाढण्याची चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. त्यादृष्टीनेही दक्षतेच्या सूचना दिल्याचे गीते यांनी सांगितले. कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू असून, येत्या सहा महिन्यांत जिल्हा कुष्ठरोग मुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात खासगी उद्योग तसेच सागरी रेल्वे प्रकल्पही आणण्याचा मानस आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा पहिला टप्पा खासगीकरणातून सुरू असून, पुढील चार टप्पे सरकारतर्फे पूर्ण केले जाणार आहेत. यातील अडचणींचे निराकरण करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक होणार आहे. मात्र, यासाठी निधीची कुठलीच अडचण नसल्याचे स्पष्ट करुन २०१७ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)