रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत, तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने निवडणूक आखाड्यात उभे ठाकले आहेत. या दोघांपैकी सामंत यांनी पक्ष बदलला आहे. मात्र, असे असले तरी या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा मुख्य लढत ही उदय सामंत व बाळ माने यांच्यातच होणार आहे. २००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी सलग दोनवेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळविला. दुसऱ्या टर्ममध्ये शेवटच्या सत्रात सामंत यांना राष्ट्रवादीने १५ महिन्यांसाठी नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपदही दिले. त्यामुळे सामंत यांचे नेतृत्व राज्यस्तरावर झळकले. दुसरीकडे बाळ माने हे १९९९ मध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर मात्र सामंत यांच्याकडून दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला आहे. परंतु त्या दोन्हीवेळची स्थिती वेगळी होती. आता महायुती तुटली आहे. भाजपा व सेना आमने - सामने ठाकली आहे. स्वबळावरच ही निवडणूक लढविली जात असल्याने अत्यंत अटीतटीचा सामना होणार हे नक्की आहे. भाजपातर्फे यंदा सलग चौथ्यांदा निवडणूक आखाड्यात असलेले बाळ माने हे यावेळी खचलेले दिसत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात संपर्क ठेवताना कार्यकर्त्यांची कामे केली आहेत. कार्यकर्त्यांच्या सुखदु:खात सहभागी झाले आहेत. मागील दोन निवडणुकांमधील आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी जय्यत तयारी केली. युतीतील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते दुधातील साखरेप्रमाणे मिसळले. मात्र, यावेळी महायुती तुटली. परंतु त्याचा काहीही परिणाम होणार नाही. युती तुटली असली तरी शिवसैनिकांशी मतभेद नाहीत. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा माने यांनी केला आहे. दुसरीकडे पालकमंत्री म्हणून काम केलेले उदय सामंत यावेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले असून, राष्ट्रवादीतील हजारो कार्यकर्ते आपल्याबरोबर आल्याचा त्यांचा दावा आहे. त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्यात ९४ पैकी ६८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तालुक्यात गावागावात सेनेच्या शाखा आहेत. त्यामुळे हा मुद्दा सामंत यांच्या पथ्यावर पडणारा आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी सेनेत आलेल्या सामंत यांना शिवसैनिकांनी स्विकारले, तर त्यांचा विजय कठीण नाही. परंतु माने यांच्या दाव्याप्रमाणे शिवसैनिकांशी त्यांचे मनभेद नाहीत, या विधानात तथ्य असेल तर ही सामंत यांच्यासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. अत्यंत वेगळ्या स्थितीत ही निवडणूक होत असल्यानेच सामंत यांची विजयाची हॅट्ट्रिक होणार की माने यांची पराभवाची मालिका खंडित होणार याकडेच आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येत्या आठवडाभरात याबाबतचे चित्र अधिकच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)पक्ष बदलला, लढतीची समीकरणे बदलली.जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत ठरण्याची अपेक्षा.सामना अटीतटीचा होण्याची शक्यता.शिवसैनिकांशी मतभेद नसल्याचा माने यांचा दावा.मानेंचा दावा खरा ठरल्यास सामंतांसाठी धोक्याची घंटा.
आखाड्यात पैलवान ‘तेच’
By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST