रत्नागिरी : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. बुधवारी दिवसभरात ६३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ६६,४९९ रुग्ण बरे झाले. जिल्ह्यात २८२ बाधित रुग्ण सापडले असून, आता रुग्णसंख्या ७०,७९३ झाली आहे. जिल्ह्यात १३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून, कोरोना बळींची संख्या २०३३ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले असले, तरी मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याखेरीज चिपळुणात ३ रुग्णांचा, तर मंडणगड, दापोली, गुहागर आणि राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे बाधितांच्या मृत्यूचा दर २.८७ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, ते प्रमाण ९३.९३ टक्के आहे. एकूण मृतांपैकी पन्नाशी व पन्नाशीपेक्षा जास्त वयोगटातील १,७०४, तर इतर आजारपण असलेले ७४२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात ७,४३३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २८२ रुग्ण सापडले आहेत. मंडणगड तालुक्यात दिवसभरात एकही रुग्ण सापडला नाही. दापोली तालुक्यात १९, खेडमध्ये १६, गुहागरात २३, चिपळुणात ४५, संगमेश्वरात २९, रत्नागिरीत ८७, लांजात ३१ आणि राजापुरात ३२ रुग्ण सापडले. सध्या १,४७५ रुग्ण लक्षणे नसलेले आणि ५२४ रुग्ण लक्षणे असलेले आहेत.