खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर महिन्यात होत आहे. याकरिता आवश्यक असलेले सोपस्कार पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २ जुलै रोजी या पालिकांच्या नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. खेडमध्ये तर अनेकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी केली असून, २ जुलैच्या आरक्षणावरच यांचे भवितव्य ठरणार आहे. मात्र, आतापासूनच या इच्छुकांची झोप उडाली आहे. जिल्हाभरातील चारही नगरपरिषदांमध्ये ही निवडणूक होणार आहे. संपूर्ण राजकारण ढवळून काढणाऱ्या खेड नगरपालिका निवडणुकीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. केवळ ४ महिन्यांवर ही निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासूनच खेड शहरातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. पूर्वीचे वॉर्ड आणि प्रभाग यामध्ये फेररचना करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासूनच हे काम प्रशासकीय पातळीवर सुरू होते. या कामाला अंतिम स्वरूप आले आहे. फेररचनेचा आराखडा खेडच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. याआधारेच २ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. याच आरक्षण सोडतीवर आता अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे.या आरक्षण सोडतीमध्ये काय होणार, कशी आरक्षणे पडणार, तसेच कोणाची सोय आणि कोणाची गैरसोय होणार, याकडे आता विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील अनेकांनी आपल्या कामाला सुरुवात केली. काही नगरसेवकांनी तर गेल्या ६ महिन्यांपासूनच लोकोपयोगी कामाला प्रारंभ केला आहे.खेडची नगरपरिषद सध्या मनसेच्या ताब्यात आहे. शिवसेनेअंतर्गत कलहाच्या राजकारणाला कंटाळूनच ही नगरपरिषद मनसेकडे गेल्याचे निवडणूक निकालाअंती स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता पुन्हा ही नगरपरिषद शिवसेना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न होणार, हे उघड सत्य आहे. मनसेने आपल्या सत्तेच्या माध्यमातून शहरातील अनेक कामे मार्गी लावल्याचा प्रचार सुरू केला आहे.गेल्या १५ वर्षांतील शिवसेनेच्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांच्या आधारे शिवसेनेचे कार्यकर्ते जनतेसमोर जाणार आहेत. शिवसेनेत सध्या सर्व काही आलबेल असल्याचे बोलले जात आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये नगराध्यक्षपदासाठी खेचाखेची सुरू आहे. पक्षीय पातळीवरच नगराध्यक्षपदाबाबतचे उमेदवार ठरत असल्याने या पदासाठी आतापासूनच इच्छुकांनी गर्दी केली आहे, असे असले तरीही स्थानिक पातळीवरही युती अथवा शहर विकास आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र, २ जुलै रोजी आरक्षण सोडत निघाल्यानंतरच उमेदवारी मिळवण्यासाठी चूरस निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)सेनेचीही मोर्चेबांधणीखेड शहरात या निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचीही ताकद आहे.त्यामुळे या निवडणुकीत मनसेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा सामना करावा लागत आहे.
पालिका निवडणुकीदरम्यान जोरदार मोर्चेबांधणी
By admin | Updated: June 28, 2016 23:03 IST