प्रशांत सुर्वे/मंडणगड : तालुकावासीयांनी सातत्याने केलेल्या मागणीनंतर दाेन वर्षापूर्वी भिंगळाेली येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात शवविच्छेदनगृह बांधण्यात आले. या गृहामुळे दापाेलीत जाण्याचा त्रास वाचला आहे. मात्र, काेराेना काळात या शवविच्छेदनगृहाचा वापर कमी झाल्याने या गृहाकडे दुर्लक्ष झाले. शवविच्छेदन गृहाकडे जाणाऱ्या मार्गावर गवत वाढल्याने रस्ताच हरवला आहे.
तालुक्यात शवविच्छेदनगृह नसल्याने तालुक्यातील नागरिकांना अपघाती व अनैसर्गिक मृत्यू झाल्यास शवविच्छेदनासाठी दापोली गाठावी लागत होती. आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे तालुकावासीयांना हक्काचे शवविच्छेदनगृह मिळण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. तालुकावासीयांच्या संघर्षामुळे आणि सातत्याने केलेल्या मागणीनंतर दोन वर्षांपूर्वी शवविच्छेदनगृह बांधून पूर्ण झाले. त्यामुळे आता दापाेलीत जाण्याची वेळ वाचली आहे. शवविच्छेदनगृहाचे कामकाज पूर्ण झाल्यावर कोविड संसर्गामुळे आराेग्य यंत्रणा कामाला लागली. या कालवधीत शवविच्छेदनगृहाचा वापरही कमी झाला. मात्र, कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे शवविच्छेदन करण्यासाठी या शवगृहाचा वापर केला जाऊ लागला.
सद्यस्थितीत शवविच्छेदनगृहाकडे जाणारा मार्गच प्रचंड वाढलेले गवत, चिखल व पाण्याने बंद झाला आहे. त्यामुळे चुकून शवविच्छेदनाची वेळ आल्यास नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुकावासीयांच्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या या शवविच्छेदनगृहाची देखभाल तरी याेग्यपद्धतीने करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.