रत्नागिरी : महावितरणकडून ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात गेली चार वर्षे कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या असून, आजच्या घडीला ११०० शेतकरी कृषिपंपांची प्रतीक्षा करीत आहेत. निविदा वेळेत काढली जात नसल्याने ही समस्या ओढवली आहे. महावितरणकडून यावर्षी जिल्ह्यात ३५ सौर कृषिपंप वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ आहे. रत्नागिरीत येणारे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे. महावितरण कंपनीकडून ‘कनिष्ठ यंत्रचालक’ व ‘कनिष्ठ तंत्रज्ञ’ पदासाठी २००९ मध्ये सरळसेवा भरतीमध्ये घोटाळा करून चक्क शैक्षणिक अर्हता डावलून पदभरती करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्रे तपासणी करण्यात आली. त्यानुसार शैक्षणिक अर्हता बसत नाही म्हणून सलग तीन वर्षे सेवा झालेल्या उमेदवारांची सेवा खंडित केली. नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सेवा खंडित झालेल्या उमेदवारास मात्र कोकण परिमंडलामध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर रुजू करून घेण्यासाठी मुख्य कार्यालयाकडून दबाव आणण्याचा अजब प्रकार सुरू आहे. महावितरण कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता कोकणासाठी विशेष कर्मचारी वर्गनियुक्ती करणे गरजेचे आहे. तसेच अनेक रिकाम्या जागांवरती कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती केली जाते. मात्र, त्यांचे वेतन सहा महिन्यांपेक्षा अधिक थकीत राहात असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कोकणातील हवामान दमट असल्यामुळे वाहिन्या तसेच अन्य उपकरणांना गंज येण्याचे प्रकार अधिक आहे. त्यामुळे कोकणाकरिता देखभाल दुरुस्ती साहित्य वेळेवर व अधिकचे मिळणे गरजेचे आहे; परंतु ते तुटपुंजे मिळत असल्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांना उपलब्ध साहित्यामध्ये काम करणे अवघड होत आहे. त्याकरिता भूमिगत वीज वाहिन्यांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. २००९ साली रत्नागिरी विभागाचे विभाजन करून लांजा विभाग करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. चिपळूण विभागाचे विभाजन करून खेड विभाग करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावेळी चिपळूण विभागाचे विभाजन होऊन खेड विभाग नवीन निर्माण केला गेला; परंतु रत्नागिरी विभागाचे विभाजन मात्र अद्याप रखडले आहे. या संबंधी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आले असून, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. ऊर्जामंत्र्यांकडून अपेक्षा कृषिपंपांच्या जोडण्या त्वरित मिळणे गरजेचे बराच काळ रिक्त राहिलेली पदे भरणे दुरुस्तीसाठी तुटपुंजे साहित्य भरतीमधील गैरव्यवहार नव्या विभागांची निर्मिती
कृ षिपंपाच्या जोडण्या रखडल्या
By admin | Updated: August 24, 2015 23:26 IST