रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलाच वेग धरला आहे. आतापर्यंत सरासरी ५२८.८२ मिलिमीटर पाऊस झाला असून, मुसळधार पावसामुळे भात लागवडीलाही सुरूवात झाली आहे. धरपाण्याच्या क्षेत्रावरील भातशेती प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे.खरीप हंगामात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येते. १० हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर नागली, १४९६ हेक्टरवर कडधान्य, ६३४.७ हेक्टरवर गळीतधान्य, तर ४७७ हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्ये मिळून एकूण ८३ हजार ६६.७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. कृषी विभागातर्फे ७०२६ क्विंटल भातबियाण्याची मागणी करण्यात आली होती. कृषी विभागाकडे उपलब्ध ४,०१६ क्विंटल भातबियाणे शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले होते. गतवर्षी कमी पर्जन्यमानामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने यावर्षी दोन हजार क्विंटल भात बियाणे अधिक मागवण्यात आले होते. खरीप हंगामसाठी १९ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी मिळाली असून, गतवर्षी १७ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले होते. त्याचे १०० टक्के वाटप करण्यात आल्याने यावर्षी दोन हजार मेट्रिक टन अतिरिक्त खताची मागणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने खताचे वितरण सुरू आहे. भात पेरणी करून रोपांची लागवड केली जाते. नांगर व पॉवरटिलरच्या सहाय्याने नांगरणी सुरू आहे. पॉवर टिलरचे तासावर भाडे आकारण्यात येत असले तरी कमी वेळेत चांगल्या प्रकारे नांगरणी होते. पाण्याची कमरता भासणाऱ्या शेतात पावसाच्या पाण्यावर प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. पाऊस चांगला बरसत असल्याने लागवडीच्या कामालाही बऱ्यापैकी वेग आला आहे. वाढती मजुरी व नांगर, पॉवरटिलरचे भाडे परवडत नसल्यामुळे गावात गटाव्दारे सामूहिक शेती करण्यात येत आहे. त्यामुळे अन्य कामांसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ‘ग्राम बिजोत्पादन’ तयार केले जाणार आहे. ग्राम बिजोत्पादनासाठी जिल्ह्यातील ५०० हेक्टर क्षेत्रावर भातपेरणी करण्यासाठी तालुकानिहाय एक ते दोन गावातून ५० ते ६० हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी बांधावरील लागवडीकरिता कृषी विभागातर्फे तुरीचे वितरण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाभरात भातलागवडीला जोशात सुरूवात
By admin | Updated: June 27, 2016 00:39 IST