राजापूर : राज्य शासनाच्या शिफारशीनुसार बारसू, सोलगाव, गोवळ आणि देवाचेगोठणे या भागात एमआयडीसीसाठी २,३०० एकर जमिनीची अधिसूचना काढण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी सभापती प्रकाश गुरव यांनी प्रांताधिकारी यांना ऑगस्ट २०२०मध्येच दिलेल्या निवेदनात स्थानिक पातळीवरील शेतकरी व ग्रामस्थांना आपल्या मागण्यांबाबत शासनाशी चर्चा करण्यासाठी समितीला विश्वासात घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
औद्योगिक विकास महामंडळ बारसू, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश गुरव यांनी उपविभागीय अधिकारी, राजापूर यांच्याकडे सोलगाव, बारसू येथील औद्योगिक प्रकल्पालगतची जमीन समाविष्ट करून घेण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दरम्यान, जाहीर करण्यात आलेले औद्योगिक क्षेत्र मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर आत असून, मुख्य रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरापर्यंतच्या जमिनी प्रकल्पात घेतल्यास जागामालक शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत, अशी ग्वाही या निवेदनाद्वारे प्रांताधिकारी तथा शासनाला देण्यात आली आहे. या निवेदनासोबत प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला एकरी किती मिळणार आहे? याचा शासनाकडून खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पाला जाणार आहे, त्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्याची विनंती करण्यात आली आहे. समन्वय समितीने दिलेल्या निवेदनावर सोलगाव, गोवळ, बारसू, कोंडसर, शेढे, कोदवली, देवाचेगोठणे, धोपेश्वर येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या सह्या आहेत. याच निवेदनात प्रकल्पांतर्गत बाधित गावातील तरुणांना प्रशिक्षण व प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरात सुसज्ज हॉस्पिटल, शैक्षणिक सुविधा व टेक्निकल कॉलेजची मागणीही केली आहे.
----------------------------
साेलगाव ग्रामपंचायतीचा रिफायनरीला पाठिंबाच
औद्योगिक क्षेत्रात जात असलेल्या काही क्षेत्रांचा वारस तपास रखडला आहे. असे वारस तपास तत्काळ करण्यात यावेत. स्थानिकांच्या या मागणीमुळे एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांना आता वाट मोकळी झाली आहे. सोलगाव ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील २६ नंबरला नोंद असलेले सार्वजनिक रस्ते खडीकरण व डांबरीकरणासाठी १९ फेब्रुवारी २०१९ रोजी आरआरपीसीएल कंपनीशी पत्रव्यवहार केलेला आहे. सोलगाव सरपंचानी दिलेल्या या पत्रात राजापूर तालुक्यात होत असलेला प्रकल्प येथेच व्हावा, यासाठी आमच्या ग्रामपंचायतीची संमती व पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्र देण्यात आले आहे.