लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या लाटेतही वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हाॅटेल्स सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही. मात्र, पार्सल सेवा आणि घरपोच सेवा सुरू आहेत. मात्र, सध्या पावसाळा सुरू असल्याने नागरिकांनी पोटाचे आरोग्य सांभाळावे, त्यासाठी बाहेरचे खाणे सध्या तरी थांबवावे, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे पहिल्या लाटेत हाॅटेल्स बंद ठेवण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये संसर्ग कमी झाल्यानंतर ५० टक्के क्षमतेवर सुरू करण्यात आली. मात्र, पुन्हा मार्चमध्ये संसर्ग वाढताच केवळ पार्सल सेवा आणि घरपोच सेवा सुरू आहे. त्यामुळे खवय्यांची पावले पुन्हा हाॅटेल्सकडे वळली आहेत. परंतु, पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरचे खाणे टाळावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जात आहे.
पावसाळ्यात हे खायला हवे
n अधिकाधिक घरातील अन्न किंवा पदार्थ खावेत.
n गार अन्न न खाता ते गरम असलेले खावे. जेणेकरून पचनाबरोबरच घशाचे विकार होणार नाहीत.
n पचनाला हलके असलेले, गरम असे पदार्थच आहारात असावेत.
n या काळात पचनक्रिया क्षीण असल्याने आहार शक्यतो कमी घ्यावा.
पावसाळ्यात हे खाणे टाळावे
n पावसाळ्यात रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळावेत.
n शिळे पदार्थ, आंबलेले पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे पोट बिघडते.
n काेल्ड्रींक्स, आईस्क्रिम, सरबत अशी पेये. गार पदार्थ या काळात खाऊ नयेत.
n दुग्धजन्य पदार्थ कमी खावेत.
n पाणी शक्यतो उकळून तसेच गरम सोसेल असे पिण्यासाठी घ्यावे.
रस्त्यावरचे अन्न नकाेच
पावसाळ्यात सर्वत्र दूषित पाणी असते. रस्त्यावरच्या उघडे अन्न अथवा खाद्यपदार्थांवर माशा बसत असतात. त्यामुळे आधीच पचनशक्ती मंदावलेली असल्याने हे उघडे अन्न खाल्ल्याने त्यापासून पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. या काळात पचनसंस्था अतिशय मंदावलेली असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही क्षीण झालेली असते. त्यामुळे अन्न किंवा खाद्यपदार्थ बाहेरचे न खाता घरचेच सकस अन्न खाण्यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर गार झालेले पदार्थ आवर्जून टाळावेत, त्यामुळे पोटाबरोबरच घशाचे विकारही वाढतात. बाहेरचे अन्न शिळे तसेच त्यात वापरले जाणारे घटक हानीकारक असतात. त्यामुळे पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळणे आरोग्यासाठी हितकारक असते.
पावसाळ्यात पचनक्रिया क्षीण झालेली असते. जुन्या काळी आषाढ महिना रोगराईचा महिना मानला जात असे, ते योग्यच आहे. पाणी साचल्याने ते दूषित होते. त्यामुळे पावसात रोगराई वाढते. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरचे अन्न न खाता घरचेच गरम आणि सकस, ताजे अन्न् खावे. पालेभाज्या, फळे याकाळात शक्यतो टाळावीत.
- डाॅ. ज्ञानेश विटेकर, फिजिशियन, रत्नागिरी
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे ताजे आणि सकस अन्न् खाल्ले नाही तर पोटाचे विकार बळावतात. त्यामुळे घरातील अन्न खाण्यावरच अधिक भर असावा. या काळात उष्ण पदार्थ खाण्यावर भर असावा. अन्न कमी खावे आणि ते पचायला हलके असे असावे. या काळात वात उच्चस्थितीत असल्याने वात वाढेल, असे थंड पदार्थ खाऊ नयेत. बाहेरचे दुग्धजन्य पदार्थही टाळावेत.
- वैद्य सिद्धेश जोशी, रत्नागिरी