चिपळूण : आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने १५ ऑगस्ट रोजी चार तक्रारदारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तक्रारदारांनी उपोषणाला बसू नये, यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी उपोषणकर्त्यांची मनधरणी सुरू केली आहे.
तालुक्यातील चिवेली येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करत चिवेली-लोणारी बंदर येथील मुबीन इस्माईल महालदार यांनी रत्नागिरी येथील जिल्हा परिषद भवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे ठेकेदार चेतक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना अटक व्हावी, या मागणीसाठी संतोष दत्तात्रय भाटकरसह तीन सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. कोयना जलविद्युत प्रकल्पग्रस्तांना महानिर्मितीच्या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी योजनेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी रत्नागिरी व सातारा जिल्हा कोयना प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी पोफळी येथील महानिर्मिती संकुल येथे उपोषणाला बसणार आहेत. मांडकी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेबाबत दहिवली बुद्रुक येथील विलास दिनकर घाग उपोषण असल्याची माहिती येथील तहसीलदार कार्यालयाकडून मिळाली आहे.