आरोग्यदायिनी प्रयोगशीलता, यातून तो हमखास खात्रीचे मार्ग दाखवतो. त्यावर नियंत्रण करणं, त्याप्रमाणं व्यक्तिगत, सामूहिक आणि देशिक वर्तणूक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. तो सर्वांना ‘सावधगिरी’ साठीचा इशारा आहे. या संभाव्य धोक्यातून सर्वसामान्यजन जास्त भरडला जात आहे. त्यानं कशी काळजी घ्यावी, एकीकडं राजकीय घडामोडीच्या वातावरणात गर्दी नियंत्रणाचं तंत्र सुटतं. दुसरं धार्मिक श्रद्धांच्या अंतरंगात गावाकडं धाव घेणं, तिसरं खेळांच्या मैदानात प्रेक्षकांचा उन्माद वाढून गर्दी करणं, या सर्व गोष्टी प्रशासनाच्या आणि आयोजकांच्याही हाताबाहेर, नियंत्रणाबाहेर जातात. अर्थात, या सर्व गोष्टी जनजीवनातील सर्वश्रेष्ठ श्रद्धा, विश्वास, सामूहिकता, अस्तित्व, संस्कार, आदरभाव, अर्थप्राप्ती, अर्थगुंतवणूक आणि जीवनातलं चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकच असतं, हे निर्विवाद सत्य आहे. त्यात मानवीय सामुदायिक आरोग्याचा ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या सामुदायिक निर्मितीक्षम मानसशास्त्राचा सिद्धांतही आहे. तो जपायलाच हवा. मात्र, त्याच वेळेस आपल्या अस्तित्वाला सुरक्षिततेचा मुलामा देणाऱ्या आणि आपल्या आरोग्य संरक्षक यंत्रणाची जी आपला जीव धोक्यात घालून आपलं जीवन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यात त्यांना सारासार विवेकशक्ती वापरून, बऱ्याचदा ती गर्दीच्या मानसशास्त्रात हरवूनच जाते, ती जपायला हवी. त्यामुळं आपलं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समुदायाचं अस्तित्व, आरोग्यमय रीतीनं जपलं जाईल.
या गर्दीच्या मानसशास्त्रात सर्वसामान्यपणे सामान्य माणूसच अगोदर भरडला जातो. कारण तोच आपल्या गरजेनुसार, क्षणभराच्या संवेदनशील भावनेनं गर्दीच्या त्या क्षणिक क्षणात सहभागी होण्यास उन्मादक अवस्थेत सहभागी होतो. त्यालाही बरीच मानसशास्त्रीय सामुदायिक कारणं आहेत. बऱ्याचदा लॉकडाऊनमुळं त्याला जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत. त्यामुळंही तो गर्दी करतो. अर्थात, संसर्ग कोविड-१९ ची साखळी तोडण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसंगी हा तोडगाही अपरिहार्य भाग ठरतो. म्हणून सर्वांनी सर्वप्रथम १) गर्दी करू नये. शासकीय नियम पाळावेतच तेच आरोग्याचा हमखास हमी देणारे आहे. सुरक्षित अंतर ठेवावंच ठेवावं. २) लसीकरण मोकळ्या मनानं करून घ्यावं. ३) मुखनासिका पट्टी (मास्क) वापरावी. ४) हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत. ५) तपासण्या करून घ्याव्यात. शंकेला वाव ठेवू नये. ६) कुठंही थुंकू नये. ७) पाणी उकळूनच प्यावे. ८) अनावश्यक प्रवास करू नये. ९) या सर्वांचा सर्वसामान्य जनांवर आणि शासनावरही आर्थिक ताण येतो. अर्थव्यवस्था मजबूत राहावी, यासाठी आपण काटकसरीचं तंत्र जे या काळात शिकतो आहोत. तो पाळावा. काही महिन्यांची ‘दक्षता’ आपल्या सर्वांना ‘स्वस्थता’ प्रदान करणार आहे. कारण आपण आरोग्यसमृद्ध राहू, तर सगळं छान होणारच आहे. कारण जगात चांगलं घडणं, ते अनुभवणं हाच तर आरोग्याचा फिटनेस फंडा आहे.
-डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी