मला आठवते, प्रादेशिक मनोरुग्णालयात मी कार्यरत असताना आठवड्यातून दोनदा सकाळी ९.००च्या दरम्यान कम सप्टेंबर (त्या वेळेचं गाजत असलेलं संगीत)चं संगीत तबकडीवर लावायचो. संपूर्ण आमराईत आणि आम्ही नंतर त्याचं नामकरण केलंलं प्रियदर्शनी रंगमंच आणि समोरचं मैदान यावर गोलाकार करुन उपचार घेत असलेले रुग्ण यांना उभे करायचो. मग बॉल एकमेकांकडे फेकण्याचा खेळ (डॉज बॉल) सुरु व्हायचा. हळुहळू सर्व मैदान या रुग्णांनी भरुन जायचं. त्यावेळचे डॉ. य. वा. केळकर, वैद्यकीय अधीक्षक आणि माझे ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ मित्र डॉ. गोविंद गोलम माझ्या या ‘संगीत खेळ उपचारावर’ जाम खुश असायचे. कारण रुग्णांचे हे खेळ, त्याचं नैराश्य पळवायचे, सक्रियता वाढवायचे. तो माणसाळायचा. आमचे ज्येष्ठ मित्र डॉ. शाश्वत शेरे, वैद्यकीय अधीक्षक असेपर्यंतचा हा मोठा काळ मी आणि तिथल्या कर्मचारी, अधिकारी यांनी अनुभवला. कारण यातून आम्ही सायको अॅनॅलिसीस (मनोविश्लेषणात्मक) उपचारांचा तो एक भाग बनला.
ही कथा सांगण्याचा हेतू एवढाच की, खेळ असे सकारात्मक, क्रियात्मक, मनोरंजनात्मक, समूहात्मक, संवादात्मक, अस्तित्वात्मक आणि निर्मितीक्षम आत्मविश्वासात्मक बदल घडवतात. आरोग्यदृष्ट्या सांगायलाच नको, फायदेच फायदे आहेत.
आदिमानव ते प्रगत मानव, कुटुंब ते टोळी आणि अन्नाची धडपड, जंगलातलं जीवन, शिकार आलीच, मग स्वसंरक्षणही आलेच. कालांतराने मानव आणि संस्कृती जोपासणं सुरु झालं. अशाच एके क्षणी समाज विकासकांच्या ध्यानात आलं. युवकांना शरीर आणि मनाने धडधाकट आणि कणखर बनवायचे आणि ऑलिम्पिक स्पर्धांचा उगम झाला. पुढे दीड हजार वर्षे स्पर्धा कालांतराने बंद पडली. कारणे अनेक असावीत. मात्र, त्याची पुन:श्च रुजवात फ्रेंच उमराव क्युबर्तीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केली. युवा पिढी, विविध देश, त्यांची अस्मिता आणि अस्तित्व फुलले. ते सामूहिक एकजुटता याचं आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि एकोप्याचे प्रतीक ठरले.
आपण मैदानी खेळांचा विचार केला पण बैठे खेळही तीच एकाग्रता आणि सकारात्मकता देतात. कॅरम, बुद्धीबळ, प्ले ब्रीज हे अतिशय आनंददायी खेळ आहेत. थोडक्यात ज्या वयात जे खेळ खेळता येतील ते खेळ खेळा. एफ. जे. सायमन या ब्रिजपटूने ब्रिज खेळावर एक सुंदर पुस्तक लिहिले आहे, त्यात ते म्हणतात, ‘स्वत: चुका करणं आणि टाळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकेच समोरच्या स्पर्धकांच्या आणि जोडीदाराच्या चुकांवर टीका करायचं टाळणं हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या चुका टळतात. सुसंवाद घडतो.’ खेळाच्या मनोविज्ञानात हा ही एक घटक महत्त्वाचा आहे. म्हणूनच खेळ संपल्यावर स्पर्धक किंवा प्रतिस्पर्धी यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करायचे असते. खेळातील चुरस किंवा लढत संपल्याबरोबर सहअस्तित्वाच्या ह्या समाजाच्या खुणा असतात. त्या जपायला हव्यात. एक सामना जिंकण्यामुळे कुणी थोर होत नाही किंवा हरल्यामुळे लहानही होत नाही. एक भान सतत हवे की, आपल्याला आपली कामगिरी उत्तम करायची आहे, त्यामुळे ही स्पर्धा स्वत:च्या उत्कर्षाचीही असते.
१९२० साली डॉ. स्कुल्स ह्या न्युरॉलॉजिस्टने (मज्जाविकार तज्ज्ञ) यांनी ऑटोजेनिक तंत्र विकसित केले. यात स्वत:च स्वत:ला स्वयं सूचना देऊन खेळात किंवा कुठल्याही स्पर्धेत भाग घेताना स्वत:ला नियंत्रित करणे आवश्यक असते, हे सिद्ध केले. ह्यानुसार या तंत्रात पायापासून डोक्यापर्यंतच्या सर्व स्नायूंत रिलॅक्सेशन, शिथिलीकरण किंवा ताणरहीत अवस्थज्ञ किंवा शांतपणा अनुभवायचा असतो. सोबत जिंकण्यासाठी स्वत:च स्वत:ला सूचना द्यायच्या असतात. याचा निव्वळ खेळातच नाही, स्पर्धेतच नाही तर अटीतटीच्या क्षणी निर्णय क्षमता आणि धडाडीसाठी नक्कीच उपयोग होतो. म्हणून प्रत्येकाने ही सवय लावून घ्यावी, अर्थात मर्यादा ओळखून नाही तर कॉमेंट यायची, ‘हा सर्व फोलपणा आहे.’ लक्षात घ्या, एक ताणरहीत क्षण शरिरातल्या बुद्धी, क्रिया याचे रसायन आणि न्युरोट्रांसमीटर्सला सकारात्मकतेने चॅनेलाईज करतात. आत्मविश्वास, स्वत:वरील नियंत्रण आणि तातडीच्या क्षणार्धातील प्रतिक्षिप्त क्रिया ही खेळातील जिंकण्याची त्रिसुत्री आहे. मला जिंकायचं आहे, याऐवजी हीच संधी मला योग्य आहे, असे म्हणत खेळाडूंचे फिटनेस पुराण इथे थांबवतो.
(पुढील फिटनेस फंडे फ्रॅक्चर्स आणि फिजिओथेरपीबाबत, क्रमश:)