रत्नागिरी : दहावी, बारावी परीक्षेसाठी बहि:स्थ विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरण्याकरिता दि. १६ सप्टेंबर ते दि. १२ ऑक्टोबरअखेर ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सूचना राज्य मंडळातर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२२ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या बसण्यासाठी १७ नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना दि.१६ सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार असल्याची सूचना राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे.
राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे दि. १७ सप्टेंबर ते दि. १४ ऑक्टोबर या कालावधीत निवडलेल्या शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजात जमा करायची आहे. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्काची पावती, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे दि. १८ ऑक्टोबर रोजी जमा करायचे आहेत.
कोरोनामुळे दहावी आणि बारावीचा निकाल जुलै-ऑगस्टमध्ये जाहीर झाला असला तरी ऑनलाइन अर्ज नोंदणीत शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यावरील तारीख ३१ ऑगस्ट अशी ग्राह्य धरण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बदल केवळ मार्च २०२२ या परीक्षेपुरता लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वयासाठी अंतिम तारीख दि. ३१ जुलै ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.